बेळगाव - येडीयुराप्पा आणि कर्नाटक सरकारच्या निमित्तानं नवी हिटलरशाही देशात निर्माण झाली आहे. ही हिटलरशाही कर्नाटक व भारताच्या भवितव्याला परवडणार नाही अशी टीका इदलहोंड येथील गुंफण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यानी पत्रकार परिषदेत केली. संमेलनात सहभागी झाल्यास अटक केले जाईल असा इशारा कर्नाटक पोलिसानी सबनीस याना दिला होता. त्या पार्श्वभूमीवर बेळगाव येथे पत्रकार परिषद घेवून त्यानी या दडपशाहीचा निषेध केला.
ते म्हणाले, सीमाभागत अनेक मराठी साहित्य संमेलने घेतली जातात. इदलहोंड येथील संमेलनाचा मी अध्यक्ष होतो. कुद्रेमनी येथेही आजच संमेलन होणार होते. पण नेहमीप्रमाणे कर्नाटक सरकारचे डोके फिरले, त्यांच्यातील नवा हिटलर जागा झाला. पोलिसांच्या मार्फत फोनाफोनी करून हे संमेलन होवू नये, तुम्ही जावू नका अशा प्रकारचे निरोप सहकारी बबन पोतदार याना दिले. अटक करण्याची धमकी देण्यात आली. ही कर्नाटक सरकार व पोलिसांची ही दादागीरी आहे, दडपशाही आहे. या झुंडशाहीला नैतीक व कायेदशीर आधार नाही. इदलहोंड येथील संमेलन सद्भावना संमेलन आहे. हे संमेलन नाकारण्याचा करंटेपणा कर्नाटक सरकार दाखवत असेल तर हा संविधानाचा खून आहे. यासाठी संविधानाचे मारेकरी म्हणून कर्नाटक सरकारवर केंद्र सरकारने गुन्हा दाखल केला पाहिजे. एवढी बदमाशी आणी लबाडी साहित्य आणी भाषेच्या संदर्भात करण्याची मुजोरी कर्नाटक सरकार करत असेल तर ते भैरप्पा यांच्या कानडी भाषेतील लौकीकाला शोभणारे नाही.
पुढे ते म्हणाले, सीमाभागातील 20 लाख मराठी भाषिकांबाबत महाराष्ट्र व कर्नाटक सरकार मिळून निर्णय घेत नाही. सर्वोच्च न्यायालयातही अजून निर्णय झालेला नाही हे येथील मराठी लोकांचं दुर्देव आहे. आधीच्या काळातील सरकारं, जनता या विषयावर रान उठवत होती. उद्धव ठाकरे सरकाने यासंदर्भात काही चांगले निर्णय घेतले आहेत. प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने काही हालचाली सुरू केल्या आहेत. याबद्दल उद्धव ठाकरे सरकारच कर्नाटक भूमीतून जाहीर अभिनंदन करणे मला आवश्यक वाटते. कर्नाटक पोलिस संमेलनस्थळीच जावू देत नसतील तर मग त्यांच्या विरोधात दादागिरी करणं आणि मराठी बाणा दाखवून हाणामारी करणं आमच्या भूमिकेत बसणारं नाही. मी ठामपणे गांधीवादी भूमिकेतून कर्नाटक सरकारचा निषेध करतो. महाराष्ट्र आणी कर्नाटकची सीमा पेटावी असे मला वाटत नाही. कारण ही सीमा पाकिस्तान व भारताची सीमा नाही.
सर्वांनी मिळुन प्रयत्न करावेत
सर्वोच्च न्यायालयात चांगले वकील देवून या प्रश्नाचा तोडगा काढा. केवळ संमेलनाचे ठराव करून हा प्रश्न सुटणार नाही. ज्या तिकडीने आणी तळमळीनं 105 हुतात्मे देवून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळविला, पण महाराष्ट्राच्या नकाशाचा एक भाग तुटलेला आहे. तो आज दहशतीखाली, अन्यायाखाली आहे. तो अन्याय दूर करण्याच्या दृष्टीने मराठी जनतेने सुद्धा आपला आवाज बुलंद करावा. असं ही ते म्हणालॆ.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.