सांगली : शिक्षकांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची २५ कोटी रुपयांची कर्जे थकवली आहेत. संबंधित ३५० शिक्षक, मुख्याध्यापकांना बॅंकेने कर्जवसुलीसाठी नोटिसा पाठवल्या आहेत. त्यामुळे वसुलीत सुधारणा होत आहे. कर्जे थकवलेल्या शिक्षकांत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचा समावेश आहे. जिल्हा बॅंकेने शिक्षकांना २५ कोटी रुपयांची कर्जे दिली होती. यातील बहुतांश शिक्षकांना याच बॅंकेतून वेतन मिळत होते. त्यानंतर काही शिक्षकांनी आपले वेतन अन्य बॅंकांत करण्यासाठी प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले. त्यामुळे जिल्हा बॅंकेची कर्जे थकली आहेत. विशेष म्हणजे जिल्हा बॅंकेची कर्जे देताना संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी यांचे हमीपत्र घेतले आहे.
त्यानुसार जिल्हा बॅंकेने सध्या जोरदार कारवाई सुरू केली आहे. मात्र, त्यावेळी घेतलेली हमीपत्रे ठराविक नमुन्यात नसल्याचा गैरफायदा संबंधित शिक्षकांनी उचलला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित शिक्षकांकडून नियमाप्रमाणे हमीपत्रे घेण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू झालेले आहे. बॅंकेकडून थकीत कर्जे वसुलीसाठी जोरदार मोहीम राबविली जात आहे. ‘एनपीए’साठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा सध्या संकल्प असून त्यासाठी सर्व कर्जदारांना नोटिसा देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात बडे कर्जदार, संस्थांचाही समावेश आहे. आता टॉप वीस, तीस नव्हे, तर सर्वच संस्था टार्गेटवर आहेत.
‘ओटीएस’ला मुदतवाढ
सांगली जिल्हा बँकेने कर्जे वसुलीसाठीच्या ‘ओटीएस’ योजनेला मुदतवाढ दिली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी एस. टी. वाघ म्हणाले, ‘बिगरशेती’च्या ३३ संस्था योजनेत सहभागी झाल्या आहेत. अद्यापही अनेक संस्थांची थकबाकी कायम आहे. त्यामुळे ओटीएस योजनेत सहभागी होण्यासाठी मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयही घेतला. सध्या ३ हजार शेतकऱ्यांनीही लाभ घेतला आहे. बॅंकेची सुमारे ४०० कोटींची कर्जे थकीत आहेत. ओटीएस योजना सुरू केली. ‘क्रेन अॅग्रो’चा निर्णय झाला आहे. महांकाली साखर कारखान्याचाही प्रश्न निकाली निघण्याच्या मार्गावर आहे. ‘स्वप्नपूर्ती’सह अन्य संस्थांबाबतही बैठका सुरू आहेत. मार्चअखेर ‘एनपीए’ १० टक्क्यांच्या आत आणला जावा, असे प्रयत्न सुरू आहेत.’
हप्ते थकले कसे?
पगारदारांना कर्ज देण्यासाठी सर्वच बँका पुढे असतात. हप्त्यांची थेट वेतनातून कपात होत असल्याने वसुलीची खात्री असते. जिल्हा बँकेने त्या लोभानेच कर्जे दिली. जोपर्यंत जिल्हा बँकेतून वेतन व्हायचे तोपर्यंत कपातीला अडचण येत नव्हती. मात्र, चतुर गुरुजींनी कर्जे घेतल्यानंतर आपले वेतन अन्य बँकांमधून होण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर गुरुजींनी हप्ते थकवण्यास सुरुवात केली. थेट वेतनातून कपात होण्यासाठी आवश्यक ती हमीपत्रे मुख्याध्यापकांकडून बँकेने घेतली नसल्याने वेतन होणाऱ्या बँकेतून कर्जाची वसुली होण्यात अडथळे आहेत.
जिल्हा बॅंकेची कर्जवसुली मोहीम जोरात सुरू आहे. नमुन्यात हमीपत्र न घेतल्यामुळे अडचणी होत्या. त्यात सुधारणा करण्यात येत आहेत. कर्जे वसुलीला प्रतिसाद मिळत आहे. कर्जवसुलीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील. कटू कारवाईची वेळ येऊ देऊ नये. शिक्षकांनी हप्ते वेळेत भरून आदर्श निर्माण करावा.’
- एस. टी. वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बॅंक, सांगली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.