अकोले: महिनाभर पुरेल एवढे धान्य होतं, तेही संपलं. जगण्याच्या ओढीने वरपडी (ता. शहापूर) येथून करोल घाटातून रात्री साडेआठला साम्रद येथे 23 जण पोहोचले. त्यात बच्चे कंपनी आणि महिलाही होत्या. जेव्हा ट्रेकर्स आणि स्थानिक लोकांना ही माहिती समजताच त्यांनी डोक्यावरच हात मारून घेतला.
या बाबत सामाजिक कार्यकर्ते व ट्रेकर्स विनायक वाडेकर यांना ही बातमी कळताच त्यांनी तातडीने यशवंत बांडे यांना मोबाईलद्वारे त्या 23 मजुरांची सोय करा. त्यांना मदत करा असा संदेश देऊन त्यांना बीड येथे पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, तहसीलदारांनी वन विभागाल या मजुरांबाबत विचारणा केली. त्यामुळे वन विभागाने त्यांना पुन्हा त्या कुटुंबाला घाटाच्या खाली पायी नेले. एवढे जीवावर उदार होऊन काहीच फायदा झाला नसल्याचे चित्र त्यांच्या चेहऱ्यावर होते.
ठेकेदाराने फिरवली पाठ
या बाबत समजते की, वन विभाग शहापूर यांनी 4 महिन्यापूर्वी वन विभागाचे कामे करण्यासाठी जुन्नर येथील ठेकेदार गजानन मोहिते यांना काम दिले. त्यांनी बीड, परभणी येथून काही मजुरांना बोलावून काम सुरु केले. मात्र मार्चमध्ये कोरोनाचा संसर्ग आला नि सर्व कामे ठप्प झाली. त्यांना ठेकेदाराने 15 मार्चला पगार दिला. त्यात त्यांनी अन्न-धान्य घेतले. मात्र, महिनाभर पुरेल एवढे धान्य संपले. नंतर ठेकेदारही गायब झाला. वन विभागाने पाठ फिरवली.
हेही वाचा - साहेब धंदाच बसला, आता काय खाणार
वरपडी (तालुका शहापूर) येथून ते चुकीच्या मार्गाने आले. त्या मार्गाने ट्रेकर्सही येण्यास घाबरतात. त्या मार्गाने 10 पुरुष 8 महिला व 5 लहान मुले असे हे 23 जण जीवावर बेतले असतानाही आले. त्यांना यशवंत बंडे भेटला. आणि ती माणसे अक्षरश डोळ्यात पाणी आणून दादा आम्ही मृत्यूच्या धाडीतून पोराबाळांसह आलो. आम्हाला रात्रभर राह्यला जागा दे. त्यांच्या डोळ्यातील पाणी पाहून यशवंतने शंकर व मारुती बांडे यांना बोलावून त्यांची राहुटीमध्ये सोय केली. पिठले, भाकरी व भात देऊन त्यांची भूकही भागवली.
खिंड आडवा नाही तर आदिवासींना संसर्ग होईल
कोरोनाचे संकट ग्रामीण भागापेक्षा शहरी भागावर अधिक असले तरी शहरातील माणसे खेड्याकडे येऊ लागल्याने कोरोनाचे काळे ढग ग्रामीण व आदिवासी भागावर दिसू लागले आहे. चोंढे घाट व तोलारखिंड मार्गे हजारो लोक आपल्या गावी जंगल तुडवत खुसकीच्या मार्गाने येऊ लागले आहेत.
गावातील माणसे खडबडून जागी झाली आहेत. मात्र, या खिंडीतून येणारे लोक थांबले नाही तर आरोग्यच प्रश्न उपस्थित होईल असे जाणकारांचे म्हणणे आहे. या बाबत तहसीलदार यांनाही स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले असून त्यांनी शहापूर तहसीलदार यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ असे सांगितले आहे. मात्र, तातडीने या खिंडी अडविल्या नाही तर मोठ्या प्रमाणात लोक गावाकडे येतील असे चित्र आहे. राजूर येथे शनिवारी याच मार्गे काही कुटुंब आले अाहे.
आरोग्य विभागाच्या कर्मचारी महिलांनी त्यांची तपासणी करून त्यांना होमकोरंटाईन केले आहे . पोलीस , आरोग्य विभाग व महसूल व स्थानिक कमिटीने याबाबत समन्वय साधून आलेल्या लोकांना 15 दिवस सोयीच्या ठिकाणी ठेवणे तसे घडले नाही तर आदिवासी भागात कोरोना प्रादुर्भाव होण्याची भीती जाणकारांनी व्यक्त केले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.