सांगली : मॉन्सूनची रिमझिम आता सुरु होणार आहे. तत्पुर्वी निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या पावसामुळे महापालिका क्षेत्रात काय अवस्था असेल याचा ट्रेलर दाखवला होता. मोकळ्या भूखंडांमध्ये पाणी साचणे, दलदल होणे, त्यातच डुकरांचा सुळसुळाट असे सगळे चित्र साथीच्या आजारांना निमंत्रण देणारे असेल. त्याची दखल घेत महापालिकेने अस्वच्छ भूखंडांबद्दल मालकांवर गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली हे अभिनंदनीय आहे. पण, महापालिकेच्या मालकीच्या अस्वच्छ भूखंडांबद्दल कुणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचे? त्याबद्दल महापालिकेवर गुन्हा का दाखल करु नये असा सवाल उपस्थित होत आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे सांगली आणि परिसरात दोन दिवस पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी "नेमेची येतो पावसाळा'प्रमाणे मोकळ्या भूखंडांमध्ये पाण्याचा निचरा न झाल्याने दलदलीचे चित्र दिसले. शामरावनगर, संजयनगर, अभयनगर, सह्याद्रीनगर यासारख्या उपनगरांमध्ये शेकडो मोकळे भूखंड आहेत. यामध्ये खासगी भूखंड मोठ्या संख्येने असले तरी महापालिकेच्या मालकीचे भूखंडही अनेक आहेत. असे कोणत्याही वापराविना पडून असलेले महापालिकेचे भूखंड सुमारे एक हजार आहेत. त्यांचा शोध घेऊन तेथे महापालिकेच्या मालकीचा फलक लावण्याचेही काम अजूनही होत नाही.
महापालिका क्षेत्रातील मोकळ्या भूखंडांमध्ये झाडे झुडपे वाढणे हे नेहमीचेच आहे. त्यात सांडपाणी सोडण्याचे प्रकारही अनेक भागात होते. त्यामुळे आधीच तेथे दलदल होते. यामुळे या परिसरात डुकरांचाही सुळसुळाट होतो. अन डासांच्या उत्पत्तीकरता हे भूखंड मोकळे रानच आहेत. त्यामुळे साथीच्या आजारांसाठी पोषक वातावरण तयार होते. यावर वारंवार चर्चा झडूनही काही कार्यवाही होत नाही. प्रत्येकवेळी खासगी भूखंड मालकांवर कारवाईची चर्चा केली जाते. मात्र महापालिकेच्या मालकीच्या भूखंडांवरील अस्वच्छतेची जबाबदारी कुणाची? त्याबद्दल कारवाई कुणावर करायची?
खासगी भूखंड मालकांवर गुन्हे
दरवर्षी पावसाळ्यापुर्वी भूखंड स्वच्छ करण्याच्या नोटीसा मालकांना बजावल्या जातात. त्यानंतर काही मालकांवर गुन्हे दाखल केले जातात. गतवर्षीही असे दोन-चार गुन्हे दाखल केले होते. यंदाही दोन गुन्हे दाखल केले आहेत. तरीही मालक भूखंड स्वच्छतेच्या फंदात पडत नाहीत. यंदा तर खासगी भूखंड अस्वच्छ ठेवल्यास तेथे महापालिका स्वच्छता करुन भूखंड ताब्यात घेईल असा इशाराही आयुक्तांनी दिला होता. प्रत्यक्षात महापालिकेच्या मालकीचे भूखंड स्वच्छ केले जात नाहीत त्याचे काय? याबाबत महापालिकेवर गुन्हा का दाखल केला जाऊ नये?
सोसायट्यांना वापरास द्यावे
महापालिकेचे अनेक भूखंड हे सोसायट्यांच्या शेजारी आहेत. सोसायट्यांना जागा देताना हे भूखंड ठेवले जातात. असे भूखंड संबंधित सोसायट्यांनाच वापरास देण्याबाबत विचार झाला पाहिजे. या ठिकाणी नाना नानी पार्क, उद्यान उभे करता येऊ शकते. त्याची जबाबदारी संबंधित सोसायट्यांवरच निश्चित करावी असा पर्याय पुढे येत आहे.
महापालिका क्षेत्रातील भूखंड हातगाडी असोसिएशनला द्यावेत. आम्ही स्वखर्चाने स्वच्छता करून त्याठिकाणी फूड पार्क उभारू. जणेकरून महापालिकेचे उत्पन्नही वाढले आणि एकाच ठिकाणी विक्रेत्यांना जागा मिळेल. यापूर्वीही आम्ही प्रस्वात दिले आहेत, त्यावर विचार व्हावा.
सुरेश टेंगले,
अध्यक्ष, हातगाडी असोसिएशन सांगली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.