सांगली ः जिल्ह्यातील द्राक्ष काढणी हंगाम 80 टक्केवर पोहोचला आहे. पलूस तालुका वगळता अन्य तालुक्यात हंगाम चार दिवसांत संपतो आहे. डाळिंब, द्राक्ष विक्रीनंतर बहुतांश शेतकरी स्वतःसाठी दुचाकी गाडी, चार चाकी, शेती खरेदी किंवा आहे त्या बागायती क्षेत्रात वाढ केली जात आहे. राहते घर किंवा बंगला असेल तर शहरी भागात मुलांच्या शिक्षणासाठी खरेदी केले जात आहे. यंदाच्या हंगामात द्राक्ष उत्पादनात 40 टक्के, तर दरात 50 टक्के घटीमुळे तोंडमिळवणी करणे अवघड झाले आहे.
गेली दोन वर्षे बागायतदार शेतकरी अडचणीत आहेत. यामुळे सध्या खर्च करताना शेतकरी शंभर वेळा विचार करतो आहे. यापूर्वी मात्र बागायतदार शेतकरी हंगामाचे पैसे आल्यानंतर घर, गाडी, बंगला, शेती, बागायती शेतीसह मुलां-मुलींची जोरदार खर्च करून लग्न, मुलांच्या शिक्षणासह सोन्याच्या खरेदीत पैसे गुतवले जात होते. गेली दोन वर्षे मात्र शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरताहेत.
जिल्ह्यात द्राक्ष हंगामात 80 टक्के बागातील फळांची काढणी पूर्ण झाली आहे. हंगामाच्या सांगतेतही दरातील घट कायम राहिलेली आहे. इंधनदरवाढीचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सध्याही चार किलोच्या पेटीला किमान 120 ते 140 तर निर्यातक्षम द्राक्षांना 160 ते 200 रुपये चार किलोला दर मिळतो आहे. दरातील घसरणीची चिंता कायम आहे. परिणामी व्यापारी, व्यावयासिकांसह शेतकऱ्यांनी आता बाजार आणि गल्लोगल्लीतून फिरुन द्राक्ष विक्री सुरू केली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर फायदा होत नाही. मात्र 30-40 रुपयांऐवजी 55-65 रुपये किलो दराने विक्री केली जाते.
द्राक्ष हंगाम फेब्रुवारीपासून जोमाने सुरू झाला. अवकाळी पाऊस, कोरोनामुळे लॉकडाऊनच्या अफवा, निर्यातीवर आलेल्या मर्यादेमुळे यंदा व्यापाऱ्यांना शोधायची वेळ बागायतदारांवर आली. अनेक शेतकऱ्यांनी दर न ठरवता केवळ बागा घालवण्यासाठी प्राधान्य दिले. अवकाळी, अतिवृष्टी, धुके, कोरोना संकट, निर्यातीवरील अनुदान कपात, दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणि सध्या राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर सरकार, प्रशासनाकडून लॉकडाऊनची दाखवली जाणारी भीती द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर आली.
शेतकऱ्यांची तोंडमिळवणी करण्यासाठी दमछाक
काही पिकांचा अपवाद वगळता गेली दोन वर्षे बागायतदार शेतकऱ्यांसाठी फारच अडचणीची ठरली आहेत. शेतकऱ्यांची तोंडमिळवणी करण्यासाठीच दमछाक होत आहे. शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे शिल्लक राहिले असते तर सर्वच बाजारपेठांत तेजी पहायला मिळाली असती. शेतकऱ्यांच्या हातात पैसा आला तरच बाजारात तेजी असते हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. कर भरणारे नोकरशाही बाजारपेठेतील मंदी भरुन काढू शकत नाही. खरे तर आम्ही त्यांच्यापेक्षा अधिक कर शासनाला विविध मार्गांनी देतो.
- मोहन पाटील, अध्यक्ष, वसंत पाणीपुरवठा संस्था, कवलापूर.
संपादन : युवराज यादव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.