वडगाव मावळ - एखाद्या पिकाच्या वाणाची लोकप्रियता जास्तीत जास्त दहा वर्षे टिकून रहात असल्याचा अनुभव असताना मावळचा ब्रॅंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाताच्या इंद्रायणी या वाणाची लोकप्रियता गेल्या तेहतीस वर्षांपासून कायम आहे. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन यंदाच्या खरीप हंगामातही शेतकऱ्यांनी या वाणालाच पसंती देऊन सुमारे ८० टक्के क्षेत्रावर इंद्रायणीचीच लागवड केली आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत भाताचे वाण विकसित व प्रसारित करणारी राज्यात वडगाव मावळ, इगतपुरी व राधानगरी अशी कृषी संशोधन केंद्रे आहेत. वडगाव येथील कृषी संशोधन केंद्राने आतापर्यंत भाताचे इंद्रायणी, कुंडलिका, पवना, फुले मावळ, फुले समृद्धी हे वाण विकसित व प्रसारित केले आहे. तालुक्यात पूर्वी कोळम, चिमनसाळ, वाडा कोळम, आंबेमोहोर व कोळपी हे भाताचे पारंपरिक वाण प्रचलित होते. त्यात सुवासिक म्हणून आंबेमोहोर हे वाण प्रसिद्ध होते. येथील कृषी संशोधन केंद्राने १९८७ मध्ये आंबेमोहोर व आय आर ८ च्या संकरातून इंद्रायणी वाणाची निर्मिती केली. आंबेमोहोरचे पीक येण्यास १५५ दिवसांचा कालावधी लागत असे. त्या तुलनेत इंद्रायणीचे पीक १३५ ते १४० दिवसांत तयार होते.
आंबेमोहोरच्या तुलनेत इंद्रायणीचे उत्पादन २० ते २५ टक्के अधिक आहे. इंद्रायणी वाण चविष्ट, सुवासिक, रोगप्रतिकारक, कमी कालावधीचे व अधिक उत्पादन देणारे असल्याने ते शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले. स्थानिक वाणांची हेक्टरी उत्पादकता ८ ते ९ क्विंटल असताना इंद्रायणी या वाणाची सरासरी हेक्टरी उत्पादकता ३४ क्विंटल आहे. काही शेतकरी यांत्रिकी व सुधारित पद्धतीने लागवड करून हेक्टरी ५५ ते ६० क्विंटल उत्पादन घेतात.
मावळाप्रमाणेच भोर, वेल्हा, मुळशी तालुका, सातारा, कोल्हापूर जिल्हा व कर्नाटक राज्यातही अनेक शेतकऱ्यांची या वाणाला पसंती आहे. परंतु इतर ठिकाणच्या तुलनेत मावळच्या इंद्रायणीची चव काही न्यारीच असल्याने गेल्या काही वर्षात मावळचा ब्रॅंड म्हणून इंद्रायणीची ओळख निर्माण झाली आहे. येथील कृषी केंद्राने इंद्रायणीपेक्षा २० ते २५ टक्के अधिक उत्पादन देणारे फुले समृद्धी हे वाण २००६ मध्ये प्रसारित केले. परंतु ते अद्याप इंद्रायणीची जागा घेऊ शकले नाही. खात्रीने दर मिळवून देणारे हे वाण असल्याने यंदाही शेतकऱ्यांनी या वाणाचीच लागवड केली आहे.
गेल्या काही वर्षांत सुधारित बियाणे, मिश्र खतांचे नियोजन, यांत्रिकी व चारसूत्री पद्धतीने लागवड अशा पद्धतीने भात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होत आहे. यंदा ३० ते ३५ टक्के चारसुत्री पद्धतीने भाताची लागवड करण्यात येणार आहे. अधिक उत्पादन, सुवासिक, चिकट व ग्राहकांची मोठी मागणी आदी वैशिष्ट्यांमुळे शेतकरी इंद्रायणीला अधिक पसंती देत आहेत.
- देवेंद्र ढगे, कृषी अधिकारी, मावळ
Edited By - Prashant Patil
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.