चिंचवड, ता. १७ : चिंचवड ते वाल्हेकरवाडी आणि पुढे रावेतकडे मुख्य मार्गावर रोजच तीव्र वाहतूक कोंडी होत आहे. दररोज सायंकाळच्या वेळेत या मार्गावरून जाताना त्रास सहन करावा लागत आहे. चिंचवड गावातून वाल्हेकरवाडी चौकापर्यंत जवळपास २० ते २५ कॉलनी आहेत. प्रत्येक कॉलनीसाठी स्वतंत्र वळणे असल्याने वाहतुकीवर ताण वाढतो आहे. या गर्दीतून रस्ता ओलांडणे धोक्याचे आणि वेळखाऊ ठरत आहे, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
चिंचवडगाव ते वाल्हेकरवाडी मार्गावर वाहतूक कोंडीत भर टाकणारी प्रमुख समस्या म्हणजे अनधिकृत पार्किंग. सायंकाळच्या सुमारास या परिसरात विविध समारंभांमुळे दोन ते अडीच तास वाहनांचा मोठा ताफा असतो. यासाठी येणाऱ्या पाहुण्यांची वाहने मुख्य रस्त्यालगत उभी राहिल्याने वाहतूक ठप्प होते. रविवारी (ता.१६) सायंकाळीही साडेसात ते साडेनऊ या वेळेत नागरिकांना वाहतूक कोंडीतून मार्ग शोधताना संघर्ष करावा लागला.
या कोंडीचा वैद्यकीय सेवांवरही गंभीर परिणाम होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका अडकल्याने गुंतागुंत वाढते आहे. या परिसरात वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनचालकांमध्ये वाद, गोंधळ, धक्काबुक्कीचे प्रकार घडत आहेत. काही नागरिकांनी स्वयंप्रेरणेने वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांना कोणी दाद देत नाही. त्यामुळे
दररोजची वाढती कोंडी आणि वाढता त्रास पाहता प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत आणि वाहतूक सुरळीत करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
- नागरिकांच्या मागण्या
मुख्य रस्त्यावरील अनधिकृत पार्किंगवर कठोर कारवाई करावी
वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलिस कर्मचारी नेमावेत
गरज भासल्यास पर्यायी मार्गांची निर्मिती करणे
मुख्य मार्गावर अत्याधुनिक एआय-आधारित कॅमेरे बसवावेत
अनधिकृत पार्किंग व वाहतूक नियमभंगावर लक्ष ठेवावे
हिंजवडीहून घरी जाताना वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. या रस्त्यावरून चिंचवडेनगर, प्राधिकरण, निगडी, वाल्हेकरवाडी, रावेत, किवळे, मुकाई चौक परिसरात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यात रस्त्याकडेला रोजच मोठ्या प्रमाणात वाहने उभी केली जातात. या भागात पुरेसे वाहतूक पोलिस कर्मचारी नसल्याने वाहतुकीची समस्या जाणवत आहे.
- दिलीप पाटील, वाहनचालक
रात्री एका कार्यक्रमासाठी जवळच्या रजनीगंधा सोसायटी कॉलनी रस्त्यावरून चिंतामणी चौकामध्ये जायचे होते. त्यासाठी मला साधारण एक तास या वाहतूक कोंडीमुळे थांबावे लागले. वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस कर्मचारी नसल्यामुळे खोळंबा झाला. या परिसरात विविध सोहळ्यांसाठी येणारे लोक जागा मिळेल तेथे वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच होत आहे. त्यामुळे या ठिकाणी ताबडतोब ठोस उपायोजना करण्याची गरज आहे.
- दीपक साळवे, प्रवासी
सध्या संजीवन समाधिदिन सोहळ्यासाठी अधिकाऱ्यांसह बरेच कर्मचारी बंदोबस्तासाठी आळंदीला आहेत. त्यामुळे मनुष्यबळ कमतरता आहे. चिंचवड-वाल्हेकरवाडी-रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्षात पाहणी करून त्यावर उपाययोजना केल्या जातील.
- विवेक पाटील, उपायुक्त, वाहतूक शाखा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.