निगडी, ता.२६ ः नागरीकरणाबरोबर औद्योगीकरण झपाट्याने वाढत असताना सुद्धा तळवडे भागातील काही स्थानिक शेतकरी प्रामाणिकपणे आपली शेती सांभाळून आहेत. खर्चिक पिके घेण्यापेक्षा सध्या उन्हाळी बाजरी घेण्याकडे त्यांचा दिवसेंदिवस कल वाढत आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या काळात हिरवेगार बाजरीची शेती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
उन्हाळी हंगामातील वाढते तापमान यांच्यामुळे इतर पिकांमध्ये भाजीपाला, भुईमूग खर्चिक ठरत आहे. याशिवाय शेतकऱ्यांना मजूरांना औद्योगिक वसाहतीप्रमाणे मजुरी देणे शक्य नाही. उन्हाळ्यामध्ये इतर पिके घेताना वाढती उष्णता व रोगराईचा सामना करावा लागतो. पण, बाजरी ही कमी पाण्यात येते. जनावरांसाठी देखील उत्तम खाद्य म्हणून उपलब्ध होते. याशिवाय बाजरीला दिवसेंदिवस बाजारातही ग्राहकांकडून मागणी वाढत असल्यामुळे बाजारभावही चांगला मिळत आहे. मजुरांची फारशी गरज नसताना उत्तम प्रकारचे पीक घेता येते. हे पीक आर्थिक दृष्ट्या परवडणारे असल्यामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला किंवा इतर काही पिके घेण्यापेक्षा बाजरीचे पीक घेण्याकडे कल दिसून येत आहे. हे गणित लक्षात घेऊन शेतकरी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये चांगले बाजरीचे पीक घेत आहेत.
पावसाळ्याकडे पाठ
यापूर्वी बाजरीची पिके पावसाळी हंगामात घेतली जात होती. पण, पावसाळी हंगामात पडणारा पाऊस व त्यातून होणारे नुकसान आणि वाया जाणारे सरमाड यामुळे बाजरीचे उत्पादन आता मात्र उन्हाळ्यातच घेणे अधिक फायदेशीर ठरत असल्याचे भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. आताच्या काळात मशिनवर बाजरी होत असल्यामुळे मजुरांचे प्रमाण कमी आहे.
कारणे काय ?
- कमी खर्चात, कमी पाण्यात उत्पादन
- सध्या बाजरीला बाजार भाव चांगला
- नवीन वाणाचा बाजारात विकास, एकरी उत्पन्नही चांगले
- घरगुती वापरासाठीही धान्य म्हणूनही बाजरीला पसंती
कमी दिवसांत आणि कमी पाण्यात उत्पादन आणि खर्च वजा केल्यास उन्हाळी बाजारी चांगले उत्पन्न देत आहे. त्यामुळे उन्हाळी बाजरी घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.
- जगन भालेकर, स्थानिक शेतकरी