पिंपळे गुरव, ता.१५ ः नवी सांगवी परिसरातील कृष्णा चौक ते एम. एस. काटे चौक रस्त्यावरील खाऊ गल्ली, ज्ञानेश पार्क येथे मंगळवारी (ता. १४) रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास महावितरणचे रोहित्र सुमारे दीड तास जळत राहिले. त्याच्या आगीची झळ नजीकच्या तीन अनधिकृत दुकानांनाही बसली.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित्राने अचानक पेट घेतला. या दुर्घटनेची माहिती मिळताच रहाटणी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाण्याच्या सहाय्याने आग शमविली. तसेच एक गॅस सिलिंडर सुरक्षितपणे बाहेर काढला. दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी पोहोचून खबरदारीचा उपाय म्हणून विद्युत पुरवठा तातडीने खंडित केला. रोहित्राला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
महावितरणच्या डीपी बॉक्स, रोहित्र व आर.एम.यू. बॉक्स परिसरात अतिक्रमणांमुळे अपघातांचा धोका वाढत आहे. संबंधित विभागाने अतिक्रमणधारकांवर तातडीने कारवाई करावी. तसेच नागरिकांनीही या विद्युत उपकरणांपासून सुरक्षित अंतर राखावे.
- संतोष पंचरस, अभियंता, महावितरण, पिंपळे गुरव