पिंपरी, ता.४ ः ऐन दिवाळीच्या काळातच शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षा होणार आहे. त्यामुळे, आता दिवाळीच्या सुटीमध्ये विद्यार्थांना नाही; तर शिक्षकांनाच अभ्यास करावा लागणार आहे. अंदाजे २ हजार शिक्षकांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे ५२ वर्षांच्या आतील सर्व शिक्षकांना फक्त दोन वर्षांतच टीईटी उत्तीर्ण व्हावे लागणार आहे, अशा स्थितीत किती शिक्षक ही पात्रता परीक्षा गांभीर्याने घेतात आणि उत्तीर्ण होतात ते पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य परीक्षा परिषदेने महाटीईटी परीक्षेची घोषणा केली आहे. सध्या टीईटी परीक्षेची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. शहरात प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांची संख्या तब्बल २१५ इतकी आहे. या शाळांमध्ये एकूण १० हजार शिक्षक शिकवायला आहेत. त्यातील अंदाजे २ हजार शिक्षकांना टीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. धक्कादायक म्हणजे, ५३ वर्ष वय असणाऱ्या शिक्षकांना फक्त २ वर्षांतच टीईटी उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. अशांची २ हजार इतकी संख्या आहे. वयाच्या ५५ वर्षांपर्यंत हे शिक्षक टीईटीची परीक्षा उत्तीर्ण नाही झाले; तर त्यांना सेवानिवृत्ती सक्तीची केली आहे. शिवाय शिक्षकांना पदोन्नती हवी असेल; तर त्यांना टीईटीची परीक्षा देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गावर नियुक्ती असलेल्या ५२ वर्षांच्या आतील सर्व शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबरच्या आदेशानुसार दोन वर्षांत नोव्हेंबरला टीईटी परीक्षा उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे. वर्षातून एकदाच टीईटी होत असल्याने पुढील महिन्यात २३ नोव्हेंबरला होणारी टीईटी शिक्षकांसाठी पहिली संधी असणार आहे.
कनिष्ठाला मुख्याध्यापकाची संधी
शिक्षकांना पदोन्नतीच्या प्रत्येक टप्प्यावर ‘टीईटी’ची अट घातल्याने सेवाज्येष्ठ शिक्षकांऐवजी टीईटी उत्तीर्ण असलेला कनिष्ठ शिक्षकाला मुख्याध्यापक होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे, संघटना आणि शिक्षकांकडून या निर्णयाला विरोध केला जातोय. दुसरीकडे शाळाबाह्य कामाच्या जबाबदारीने शिक्षक त्रस्त आहेत. अशात टीईटी उत्तीर्ण होण्याची जाचक अट घातल्याने शिक्षकांचा मनःस्ताप आणखी वाढला आहे.
अर्ज करण्यास मुदतवाढ
राज्य परीक्षा परिषदेमार्फत २३ नोव्हेंबर २०२५ रोजी घेतलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) अर्ज करण्यास ९ ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पूरस्थिती निर्माण झाल्याने उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्यास अडचणी आल्यामुळे ही मुदतवाढ दिली आहे. उमेदवार नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे परीक्षा शुल्क भरुन ९ ऑक्टोबर रोजी रात्री ११.५९ मिनिटांपर्यंत अर्ज करु शकतात. यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.
सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाच्यावतीने फेरविचार (रिव्ह्यू) याचिका लवकरच दाखल करण्यात येईल. त्याची प्रक्रिया सुरू करत आहोत, असे आश्वासन मिळाले आहे. त्यानंतर सभा घेत यासाठी संघटनेच्यावतीने १८ ऑक्टोबरपर्यंतचा अवधी शासनाला देण्याचे संघटनांनी ठरविले आहे. या कालावधीत हालचाल न झाल्यास ८ नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी मोर्चा आंदोलन करण्यात येईल, असे ठरवण्यात आले.
- मनोज मराठे, राज्य सरचिटणीस, राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.