चिखली, ता.१६ : भूमिगत केबल तुटल्याने चिखलीतील मोरे वस्ती परिसरात रविवारी सकाळी नऊ वाजता खंडित झालेला वीजपुरवठा सोमवारी सायंकाळ पाच वाजेपर्यंत सुरळीत होऊ शकला नाही. विजेअभावी टाक्यांमध्ये पाणी चढवता आले नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. याबाबत महावितरण कर्मचाऱ्यांना नागरिकांनी विचारणा केली असता त्यांना उडवा उडवीची उत्तरे दिल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.
मोरे वस्ती येथील अष्टविनायक चौक परिसरात रविवारी सकाळी केबलमध्ये बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित झाला. तीन केबलपैकी एका केबलद्वारे काही काळ वीज पुरवठा सुरू होता. मात्र, इतर दोन केबलवरून वीज जोड घेतलेल्या नागरिकांकडे वीज पुरवठा खंडित झालेला होता. भोसरी विभाग महावितरणच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क केल्यानंतर अखेर सायंकाळी पाच वाजता मशीनद्वारे केबलमधील बिघाड शोधण्यात आला. तांत्रिक बिघाड शोधल्यानंतर सोमवारी पहाटे अडीच वाजता वीज पुरवठा सुरळीत झाला. मात्र, पुन्हा सकाळी सहा वाजता वीजपुरवठा खंडित झाला. तो सोमवारी पाच वाजेपर्यंत सुरळीत झाला नव्हता.
चौथ्या मजल्यापर्यंत पाणी
अष्टविनायक चौक परिसरापासून खाली असलेल्या राजगड पार्क, माउली हाउसिंग सोसायटी परिसरात सुमारे २४ तासांपेक्षा अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांचे पाण्यावाचून प्रचंड हाल झाले अनेक महिलांना तळमजल्यावरून तिसऱ्या ते चौथ्या मजल्यापर्यंत वापरासाठी पाणी घेऊन जावे लागले.
वीज पुरवठा करणाऱ्या केबलमध्ये दोन वेळेस तांत्रिक बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. केबल दुरुस्तीनंतर वीजपुरवठा सुरळीत होईल.
- अशोक जाधव, उपकार्यकारी अभियंता, भोसरी विभाग, महावितरण
‘‘मोरे वस्ती येथील अष्टविनायक चौक परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. मात्र, एकदा खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी बारा ते पंधरा तास लागतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांना केबल बदलण्याबाबत वारंवार विनंती करण्यात आलेली आहे. मात्र अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे.’’
- जीवन बोराडे, रहिवासी