पिंपरी, ता. ४ : दिघी परिसरात सध्या सुरू असलेल्या रस्त्यांच्या संथ कामामुळे स्थानिक रहिवासी आणि प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवल्यामुळे आणि कामाचा वेग मंदावला आहे. तसेच संपूर्ण परिसरात धूळ पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
दिघी परिसरात रस्त्यांवरील खडी आणि मातीमुळे उडणाऱ्या धुळीमुळे दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना श्वास घेणे कठीण झाले आहे. यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठांना खोकला, दमा आणि डोळ्यांच्या जळजळीचा त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. तसेच कामामुळे रस्ते अरुंद झाले असून गर्दीच्या वेळेत मॅगझीन चौक आणि दिघी परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत आहे.
यावर ‘‘प्रशासनाने दिघी-आळंदी रस्ता आणि अंतर्गत रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत. केवळ सिमेंटचे रस्ते न बांधता दुतर्फा झाडे लावून हरित क्षेत्र विकसित करावे. यामुळे भविष्यातील प्रदूषण कमी होईल. रस्त्याचे काम सुरू असताना संबंधित कंत्राटदाराने पाण्याचे टँकर वापरून धूळ कमी करावी,’’ आदी मागण्या नागरिकांनी केल्या आहेत.
विकास हवा आहे. पण, तो जीवावर बेतणारा नको. प्रशासनाने रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे. तसेच, धूळ उडू नये म्हणून नियमितपणे पाण्याचा फवारा मारणे आवश्यक आहे.
- नितीन लावंड, दिघी