पिंपरी, ता. २९ ः महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १२० वर्षाच्या इतिहासात उपेक्षित वर्गाचे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले प्रभाकर ओव्हाळ हे मिळालेल्या संधीचे सोने करतील, असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केला. सोहम सार्वजनिक ग्रंथालय, अंशुल प्रकाशन व जगद्गुरू प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे जिल्हा प्रमुख पदी निवडून आल्याबद्दल साहित्यिक ओव्हाळ व राजन लाखे यांच्या सत्कारानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. संत तुकारामनगर येथील ग्रंथालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी महापौर रवी लांडगे, परिषदेचे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, मानव कांबळे, जगन्नाथ नेरकर, ॲड. लक्ष्मण रानवडे यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन गिरीश वाघमारे यांनी केले तर विष्णू मांजरे यांनी आभार मानले.