पवनानगर, ता. २० : पवना धरणात बुडून पिंपरीतील एका तरुणाचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ऋतिक कैलास साखरे (वय २४, रा. नखाते नगर, रहाटणी फाटा, काळेवाडी) असे मृताचे नाव आहे. तो सात मित्रांसह दुपारी काले गावच्या हद्दीत नदीच्या परिसरात फिरायला आला. सर्व जण नदीच्या पात्रात उतरून पोहू लागले. मात्र, जलाशयात उतरलेल्या ऋतिकला पाण्याचा खोलीचा अंदाज आला नाही. तो बुडू लागल्याचे पाहून मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. स्थानिकांनी आणि मित्रांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रच्या बचावकार्य पथकाला पाचारण केले. ‘वन्यजीव रक्षक मावळ संस्था’ आणि लोणावळ्यातील ‘शिवदुर्ग मित्र’ या संस्थांचे नीलेश संपतराव गराडे, आकाश मोरे, आनंद गावडे, कपिल दळवी, योगेश दळवी, गणेश भांगरे, वैष्णवी भांगरे, महेश मसने आणि सुनील गायकवाड यांच्या पथकाने अर्ध्या तासात ऋतिकचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे नवनाथ चपटे तपास करीत आहेत.
-----