रावेत, ता.२१ : रावेत परिसरातील विविध बांधकामे, रस्ते दुरुस्ती आणि वाढत्या वाहतुकीमुळे हवेत मोठ्या प्रमाणावर धूळ पसरत आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून डोळ्यांच्या संसर्गाने ग्रस्त रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे तातडीने रस्त्यांवर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे उडणारी धूळ थेट डोळ्यांत जात असल्याने डोळे लाल होणे, जळजळ होणे, पाणी येणे आणि खाज सुटणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना याचा अधिक त्रास होत आहे. शाळा आणि कार्यालयीन वेळेत वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे.
स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, बांधकाम साहित्य रस्त्यावरच साठवले जात असल्याने धुळीचे प्रमाण वाढत आहे. तसेच काही ठिकाणी मोकळे मातीचे ढीग पडून असल्याने वाऱ्यामुळे धूळ सर्वत्र पसरत आहे.
दररोज सकाळ आणि संध्याकाळ रस्त्यावरून जाताना डोळ्यांत प्रचंड जळजळ होते. डॉक्टरांनी मला धुळीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. पण, कामानिमित्त बाहेर पडणे भाग असते. महापालिकेने नियमित पाणी फवारणी करावी.
- निमा जॉन, स्थानिक नागरिक
बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षेचे नियम पाळले जात नाहीत. रस्त्यावर धूळ उडते आणि वाहन चालवताना देखील त्रास होतो. लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- अशोक बेलसरे, नागरिक