तळेगाव दाभाडे, ता. २२ : पवना धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरल्याने येत्या ३१ ऑगस्टपर्यंत केवळ पिण्याच्या पाण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. सिंचनासाठी होणारा पाणी उपसा बंद करण्याचा आदेश पाटबंधारे विभागाने जारी केला.
सध्या धरणात केवळ १८.५० टक्के पाणीसाठा आहे. यात उपयुक्त पाणीसाठा १.६७ टीएमसी इतकाच शिल्लक आहे. खडकवासला पाटबंधारे विभागांतर्गत पवना धरण प्रकल्पाच्या वतीने सूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार संभाव्य पाणीटंचाई आणि ‘एल-निनो’च्या परिस्थितीचा विचार करून शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा आवश्यक पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत.
नागरिक, शेतकरी, लाभधारक, व्यावसायिक तसेच मिळकतधारकांनी पाण्याचा वापर केवळ अत्यावश्यक गरजांसाठी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाण्याचा अपव्यय टाळून त्याचा जपून व नियोजनबद्ध वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जलसंपदा विभागाच्या १३ जूनच्या शासन पत्रानुसार धरण परिसरात सिंचनासाठी होणारा पाणी उपसा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. तसेच धरण, नदी, कालवे, तलाव व अन्य जलस्रोतांमधून कोणत्याही प्रकारचा अनधिकृत किंवा बेकायदेशीर उपसा तत्काळ थांबविण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय, शासन निर्णय १२ डिसेंबर २०१८ नुसार बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पाटबंधारे विभागाने दिला.
‘पाणी वाचवा-भविष्य वाचवा’ असा संदेश देत पाटबंधारे विभागाने नागरिकांना पाणी बचतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सध्या धरणातील उपलब्ध साठा आणि पावसाची अनिश्चितता लक्षात घेता आगामी काळात पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
-----
पवना धरणातून बेकायदेशीरपणे पाणी उपसा करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर योग्य करावा.
- रजनीश बारिया, शाखा अभियंता, पवना धरण
----
फोटो
29014