पुण्यात कल्याणी नगर इथे झालेल्या हिट अँड रन केसची चर्चा सध्या सगळीकडे आहे. वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत पोर्शे गाडी चालवत दोन तरुण मुलांचा बळी घेतला. या घटनेवर आता मराठी अभिनेते हृषीकेश जोशी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली.
पोलिसांनी या अल्पवयीन आरोपीला अटक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हॉलिडे कोर्टात हजर केलं. यावेळी कोर्टाने सुनावल्या शिक्षेने सगळेचजण चक्रावले. सुनावणीनंतर न्यायालयाने या आरोपीला काही अटींवर जामीन मंजूर केला होता. त्यात न्यायालयाने अल्पवयीन मुलाला घडलेल्या कार अपघातावर ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगितलं होतं. तसंच आरोपीने १५ दिवस येरवडा विभागात ट्रॅफिक कॉन्स्टेबलबरोबर वाहतुकीचं नियोजन करावं अशा अटी सांगण्यात आल्या.
अपघातात दोन तरुणांचे बळी गेल्यानंतर ट्रॅफिक या विषयावर निबंध लिहायला लावणे यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखकी हृषीकेश जोशी यांनीही सोशल मीडियावर पोस्ट लिहीत त्यांची नाराजी व्यक्त केली. “मग आता निबंधात कमी मार्क्स मिळाले म्हणून तुरुंगात घालायचा कायदा तरी आणा… (पुणेप घात)” अशी मार्मिक पोस्ट लिहीत हृषीकेश यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली.
अनेकांनी हृषीकेश यांच्या पोस्टवर कमेंट करत त्यांच्या नाराजीचं समर्थन केलं आणि आरोपीला कठीण शिक्षा व्हायला हवी अशी मागणी केली.
दरम्यान, या घटनेबद्दल सोशल मीडियावर सगळेजण नाराजी व्यक्त करत आहेत. मृत अश्विनी व अनिशच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्या आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
“पुण्यातील अपघातात दोघांचा मृत्यू झाल्यानंतरही पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाला सोडून दिलं. याप्रकरणात जी कलमं दाखल व्हायला हवी होती, ती दाखल करण्यात आली नाही. खरं तर याप्रकरणात काल या आरोपीच्या वडिलांनाच अटक व्हायला हवी होती. मात्र, या उलट पोलिसांनी रेडकार्पेट टाकून आरोपीला घरी पाठवलं. खरं तर यात काही कोटी रुपयांचा व्यवहार झाला,” असा दावा काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी टीव्ही ९ शी बोलताना केला आहे.