पुण्यातील सध्या हिट अँड रन केसचं प्रकरण सध्या खूप गाजतंय. वेदांत अग्रवाल या अल्पवयीन श्रीमंत मुलाने त्याच्या आलिशान गाडीने मद्यधुंद अवस्थेत दोन तरुणांचा बळी घेतल्याचं घटनेमुळे सगळ्यांच्या पुन्हा एकदा सलमान खान हिट अँड रन केसच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
2002 मध्ये घडलेलं सलमानचं हे प्रकरण अजूनही अनेकांच्या लक्षात आहे. बराच काळ सलमानवर केस सुरु होती पण अखेर सलमान या प्रकरणातून सुटला.
2002 साली सलमानवर हिट अँड रन केसचा आरोप ठेवण्यात आला. नेमकं घडलं असं कि, 27 आणि 28 सप्टेंबरच्या रात्री ही घटना घडली. सलमान आणि कमाल खान सलमानच्या घरातून लँड क्रुझर गाडीतून रेन बारमध्ये गेले. त्यांच्यासोबत त्यांचे सुरक्षारक्षक रवींद्र पाटील उपस्थित होते. त्यानंतर सलमान आणि कमाल जे डब्लू मॅरीयॉट हॉटेलमध्येही गेले. दोन्ही वेळेला रवींद्र पाटील यांनी दिलेल्या जबानीनुसार सलमान गाडी चालवत होता.
रवींद्र यांच्या जबानीनुसार सलमान दारूच्या नशेत होता आणि त्याने दारूच्या नाशेत वांद्रयातील अमेरिकन बेकरीजवळ फुटपाथवर गाडी ठोकली. त्याच्या गाडी खाली फुटपाथवर झोपलेले चारजण चिरडले. त्यातील एकाचा मृत्यू झाला आणि तिघे गंभीर जखमी झाले. जमलेली गर्दी बघून घाबरलेल्या सलमानने तिथून पळ काढला तर रवींद्र पाटील यांनी एफआयआर दाखल केला.
रवींद्र यांच्या जबानीनुसार पोलिसांनी सलमानला अटक केली पण सलमानने दिलेल्या जबानीत तो गाडी चालवत नव्हता तर त्याचा ड्रॉयव्हर अशोक सिंह 30-40 च्या स्पीडवर गाडी चालवत होता. गाडीचा कंट्रोल सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचं सलमानने सांगितलं होतं. ड्रायव्हर अशोकनेही ही गोष्ट मान्य केली होती पण पुढे तपासात सलमानचा ड्रायव्हर खोटं बोलत असल्याचं सिद्ध झालं आणि त्याच्यावर खोटी माहिती देण्याचा आरोप ठेवण्यात आला.
पण याच दरम्यान या घटनेचा मुख्य साक्षीदार रवींद्र पाटील बऱ्याचदा बेपत्ता झाला आणि त्याचं टीबीने निधन झालं. पुराव्यांअभावी सलमानची या केसमधून निर्दोष म्हणून सुटका करण्यात आली.
ही घटना आजही लोकांच्या मनात ताजी असून अनेकजण केवळ सत्ता आणि पैशांच्या जोरावर सलमान या केसमधून सुटला असं म्हणतात पण या प्रकरणात नेमकी कोणाची चुकी होती हे अजून उघड झालं नाहीये.
दरम्यान, पुण्यातील वेदांत अग्रवाल केसमध्ये आता देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातलं असून वेदांतवरील एफआयआर मध्ये बदल करणाऱ्या आणि शिक्षेबाबत सुरु असलेल्या चर्चेबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या अपघातामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. हा अपघात करणाऱ्या अल्पवयीन मुलाला जामिन मिळाल्यानंतर या संतापात आणखी भर पडली आहे. नागरिकांच्या दबावामुळे आता या अल्पवयीन मुलाच्या फरार झालेल्या वडिलांना संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. तर अल्पवयीन मुलावर सज्ञान म्हणून खटला चालवला जाणार आहे.