तंत्रज्ञान कितीही प्रगत झालेले असले तरी विनाअपघात प्रवास होण्यासाठी चालकावरच विसंबून राहावे लागते. आणि चालक कितीही अनुभवी असला तरी अपघात होणारच नाही, याची खात्री कोणालाच देतात येत नाही. मात्र ‘अॅडास’मुळे (ADAS) अपघातांची शक्यता नक्कीच कमी होऊ शकते.
आपल्याकडच्या महामार्गांची स्थिती झपाट्याने बदलत आहे. पूर्वी फारतर दुहेरी असणारे हे महामार्ग आता सहा-सहा पदरी झालेले आहेत. तसेच समतल, सिमेंटची बांधणी आणि कमी अडथळे असल्याने गाड्यांचा वेगही सहजपणे तिसऱ्या आकड्यापर्यंत पोहचतो आहे. यमुना एक्सप्रेस वे किंवा आपल्याकडील बांधले गेलेले, नव्याने बांधले जाणारे महामार्ग ही याची उत्तम उदाहरणे म्हणता येतील.
मात्र अशा या महामार्गांवरील अपघातांमध्ये गेल्या वर्षी (२०२२) सुमारे १ लाख ५५ हजारांहून अधिक जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. यातील बहुतांश अपघात हे केवळ अतिवेग आणि चालकांच्या चुकीमुळे घडलेले आहेत.
तंत्रज्ञान कितीही प्रगत झालेले असले तरी अद्याप गाडी विनाचालक, आपोआप चालणे शक्य नसल्याने, सध्या तरी आपल्याला चालकावर अवलंबून राहावे लागणार आहे. मात्र अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम (ADAS) हा अपघातांचा धोका कमी करण्याचा उत्तम पर्याय आहे. सध्या आपल्याकडील महिंद्रा, टाटा, एमजी, ह्युंदायी, टोयोटा, होंडा, बीवायडी यासारख्या कंपन्यांनी आपल्या गाड्यांमध्ये अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम देण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेत कित्येक पटीने वाढ झालेली आहे.
अॅडास कसे काम करते ?
चालकांच्या दुर्लक्षामुळे किंवा त्यांच्या चुकीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी अॅडासचा वापर करण्यात येतो. ही सिस्टीम कॅमेरे, सेन्सर आणि रडारच्या माध्यमातून कार्यरत असते. काही कारणास्तव वाहन अचानक लेन कटिंग करत असल्यास चालकाला लगेचच या सिस्टीमद्वारे बझर आणि डिजिटल मीटर वापरून सूचना देत भानावर आणले जाते. क्रूझ कंट्रोलच्या माध्यमातून वेगावर आपोआप नियंत्रण मिळवून पुढील वाहन आणि आपल्या वाहनात सुरक्षित अंतर राखले जाते. बझर किंवा इतर सूचनेला चालकाने प्रतिसाद न दिल्यास आपत्कालीन ब्रेक लावले जातात. त्यामुळे अपघाताचा धोका टळतो.
ब्लाइंड स्पॉटवर इतर वाहने न दिसल्याने अनेक अपघात होतात. मात्र त्यावरही अॅडास वापरून मात करण्याचा प्रयत्न होत आहे. याद्वारे ब्लाइंड स्पॉटवरील वाहनांची सूचना दिली जात असल्याने चालक वेळीच जागरूक होत असल्याने अपघात रोखला जाऊ शकतो. रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट हे या सिस्टीमचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल. पार्किंगमधून गाडी मागे घेताना मागून किंवा आजूबाजूने येणाऱ्या वाहनांचा किंवा इतर अडथळ्यांचा अंदाज चालकाला नसतो. अशावेळी रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्टद्वारे ड्रायव्हरला सूचना मिळते. त्यामुळे अपघात टळतात आणि पार्किंग अधिक सहजपणे करता येते.
हायवे हिप्नोसिसवर प्रभावी
हायवे कोणताही असो त्यावर होणाऱ्या बव्हंशी अपघातांचे प्रमुख कारण चालकाची नजरचूक हेच असते. मात्र चालकांची अशी चूक होण्यास अनेकदा हायवे हिप्नोसिस (महामार्ग संमोहन) कारणीभूत ठरत असतो. आपल्याकडील नवीन झालेले महामार्ग असो वा एक्सप्रेस वे असोत; ते बरेचसे सरळ रेषेत जाणारे आहेत. अडथळे कमी आणि घाटांची संख्याही मर्यादित असल्याने बहुतांश चालक हायवे हिप्नोसिसचे बळी ठरतात. खूप लांब अंतर कापताना चालकांचा शक्यतो नॉनस्टॉप जाण्याकडे कल असतो. मात्र सततच्या गाडी चालविण्याने एक वेळ अशी येते की चालकाचे डोळे उघडे असतात, मात्र तो झोपलेला असतो. प्रतिक्षिप्त क्रिया करण्याची किंवा एखाद्या घटनेला प्रतिसाद देण्याची त्याची क्षमता त्यावेळी अजिबात नसते. त्यामुळे अपघात होतात.
लांबचा प्रवास एका दमात करण्याऱ्या चालकांना अनेकदा प्रवासादरम्यान आजूबाजूला घडलेल्या घटना किंवा इतर तपशील प्रवास झाल्यानंतर आठवत नाही. थोडक्यात ते त्यावेळी हायवे हिप्नोसिसचे बळी ठरलेले असतात. रात्री उशिरा किंवा मध्यरात्री, पोटभर जेवण करून भर उन्हात गाडी चालविणाऱ्यांच्या बाबतीत हा धोका कित्येक पटीने वाढलेला असतो. मात्र अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीमद्वारे वेग नियंत्रण होऊन किंवा चालकाला योग्य वेळी बझर आणि डिस्प्लेद्वारे सूचना दिल्या गेल्याने किंवा अगदी आपत्कालीन ब्रेकिंगमुळे हायवे हिप्नोसिसमुळे होणारे अपघात कमी होऊ शकतात.
केवळ टॉप सेगमेंटमध्ये उपलब्ध अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीमच्या या सकारात्मक बाबी असल्या तरी अद्याप भारतामध्ये एंट्री सेगमेंट किंवा मिड सेगमेंट गाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही. या तंत्रज्ञानासाठी वापरण्यात येणारे कॅमेरे, सेन्सर, रडार आणि त्यांद्वारे मिळणाऱ्या डेटाचे विश्लेषण करून सिस्टीम ऑपरेट करणाऱ्या कॉम्प्युटरची किंमत सध्या तरी जास्त आहे. त्यामुळे टॉप सेगमेंट गाड्यांमध्येच ही सिस्टीम ठरावीक कंपन्यांच्या गाड्यांमध्ये उपलब्ध आहे.
अॅडासबाबत हवी जागरूकता ही सिस्टीम कशा पद्धतीने कार्य करते याची माहिती, या तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली गाडी चालवणाऱ्या कित्येक चालकांना नसते. त्यामुळे सिस्टीमकडून सूचना मिळूनही त्याकडे दुर्लक्ष करण्याची चालकांची वृत्ती असल्याने अनेक अपघातांना निमंत्रण मिळते. यासोबतच या सिस्टीमसाठी अनेक सेन्सर, कॅमेरे आणि रडार वापरात येत असल्याने त्यांची वेळच्या वेळी देखभाल करणेही आवश्यक असते. तसे न झाल्यास नेमक्या वेळी ते कार्य करू न शकल्याने अपघात होतात.
केंद्र सरकारचे विशेष प्रयत्न येत्या दोन वर्षांत, २०२५पर्यंत, महामार्गांवरील अपघात ५० टक्क्यांनी कमी व्हावेत या केंद्र सरकारच्या धोरणाचा भाग म्हणून सर्वच कंपन्यांच्या गाड्यांमध्ये अॅडास तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी अशा तंत्रज्ञानाचा वापर करून वाहने तयार करणाऱ्या उत्पादकांना करांमध्ये सवलती देण्यासह ग्राहकांना या विषयी अधिक जागरूक करण्यासाठीच्या योजनांवरही सरकार विशेष प्रयत्न करत आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात भारतातील प्रत्येक गाडीमध्ये हे तंत्रज्ञान उपलब्ध होऊन अपघातांची संख्या लक्षणीयरित्या घटलेली असेल अशी आशा करायला हरकत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.