एआयद्वारे करा प्रगत शेतीकडे वाटचाल
करण सिन्हा; म्हसवडला माण देशातील शेतकऱ्यांसाठी मेळावा
म्हसवड, ता. ४ : बदलत्या काळात शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ही पीक संगोपनासाठीचे तंत्रज्ञान ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी निश्चितपणे मार्गदर्शकपर साधन ठरू शकते. या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा, असे आवाहन माण देशी शेती माती व पाणी परीक्षण केंद्राचे संस्थापक करण सिन्हा यांनी केले.
एमकेसीएल, एनआरसीपी, एचएसबीसी आणि माण देशी फाउंडेशन यांचे विशेष सहकार्याने येथे माण देशी शेती माती व पाणी परीक्षण केंद्रातर्फे शेतकऱ्यांसाठी आयोजित शेती व्यवसायातील कृत्रिम बुद्धिमत्ता या आधुनिक कृषी प्रयोग मार्गदर्शनपर मेळाव्यात ते बोलत होते. एमकेसीएल फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वीणा कामथ, म्हसवडच्या नगराध्यक्षा पूजा वीरकर, शेतीतज्ज्ञ श्री. खेर, आयए तज्ज्ञ नियाज मुलाणी, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, माण देशी फाउंडेशनचे उपाध्यक्ष जवाहर देशमाने, निखिल चिंचकर, प्रदीप कोळेकर आदी उपस्थित होते.
श्री. सिन्हा म्हणाले, ‘‘एआयच्या आधारे शेती केल्यास पीक संगोपन करताना पिकावर संभाव्य किडीच्या प्रादुर्भाव, पिकास पाण्याची गरज, पिकाच्या जमिनीतील आर्द्रता, उन्हाची तीव्रता, वातावरणातील हवेचा वेग यासह संभाव्य पावसाचा अंदाज याची योग्य व अचूक माहिती शेतकऱ्यांनी मिळू शकते. यामुळे पीक सुरक्षित ठेवण्यास व उत्पादन वाढीस मदत होते. माती व पाणी परीक्षणाचे डिजिटल विश्लेषण, रोग-कीड ओळख, तसेच बाजारभाव नियोजन या विषयांवर मेळाव्यात तज्ज्ञाकडून विश्लेषणात्मक माहिती दिली. तंत्रज्ञानामुळे वेळेवर घेतलेले निर्णयामुळे शेती अधिक सक्षम व नफ्याची कशी होऊ शकते याचीही माहिती दिली. भविष्यातही अशा उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
B02397,
B02398
म्हसवड ः कृत्रिम बुद्धिमता तंत्रज्ञानाबाबत शेतकरी मेळाव्यात सहभागी करण सिन्हा, अनघा कामत आदी.
...................................
.