बालेवाडी, ता. १० : बालेवाडी-कसपटे वस्ती पूल कार्यान्वित होण्यापूर्वी परिसरातील वाहतुकीवर होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास करावा, या मागणीसाठी बाणेर-बालेवाडी नागरिक मंचाच्या (बीबीएनएम) प्रतिनिधींनी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावर आयुक्तांनी संबंधित विभागांशी चर्चा करून आढावा घेण्याचे आश्वासन दिले.
पिंपरी-चिंचवड आणि बाणेर-बालेवाडीला जोडणारा हा पूल सुरू झाल्यानंतर वाहतूक सुलभ होणार असली, तरी हजारो वाहनांचा अतिरिक्त भार बालेवाडीवर पडणार आहे. सध्या ममता चौक, बालेवाडी हायस्ट्रीट, दसरा चौक आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठी कोंडी होत आहे. त्यात भर पडल्यास परिस्थिती गंभीर होईल, अशी भीती मंचाने व्यक्त केली. तसेच परिसरातील शाळांबाहेर दररोज होणारी कोंडी आणि नागरिकांना सोसावा लागणारा त्रास, याकडे आयुक्तांचे लक्ष वेधले.
परिसरात मेट्रो सेवा सुरू होणार असताना पादचारी सुविधा, पदपथ आणि रस्ता ओलांडण्याची सुरक्षित व्यवस्था अपुरी असल्याचा मुद्दा बैठकीत मांडण्यात आला. बेशिस्त पार्किंग, अतिक्रमण आणि अपूर्ण अंतर्गत रस्त्यांमुळे वाहतुकीवर ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर सिग्नल व्यवस्था, नो-पार्किंग झोन, पी-१ व पी-२ नियोजन आणि इतर विविध प्रश्नांबाबत वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून अभ्यास करावा, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. यावेळी अमेय जगताप, मेघना भंडारी आणि पुष्कर कुलकर्णी उपस्थित होते.