पुणे, ता. २६ : पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात घडलेल्या विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य आरोपी बाळू लोंढे याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या उरुळी कांचन पोलिसांनी थरारकपणे पाठलाग करून अटक केली.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी हातभट्टीच्या दारूच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) करत आहे. या प्रकरणात आतापर्यंत १० ते १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सध्या ते सर्व जण न्यायालयीन कोठडीत आहेत. तर, या रॅकेटमध्ये आणखी सुमारे २० जणांचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्यांचा शोध सीआयडीची पथके घेत आहेत. हा प्रकार २६ ते २८ मे या कालावधीत दापोडी तसेच हडपसर परिसरात घडला होता.
तपासात आरोपींकडून जप्त केलेले मोबाइल फोन आणि इतर तांत्रिक पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळू लोंढे गुन्ह्यानंतर फरार झाला होता. सीआयडी, तसेच पुणे ग्रामीण पोलिस आणि पुणे पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो मे महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता. उरुळी कांचन पोलिसांना बाळू लोंढे हा लोणी काळभोर तसेच उरुळी कांचन या भागात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिस त्याचा गुप्त पद्धतीने शोध घेत होते.
अन्य आरोपींचा शोध घेतला जाणार
या गुन्ह्यात आर्यन संजीव धोत्रे (वय २४) आणि कल्पेश अशोक अग्रवाल (वय २९) यांना मंगळवारी अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना एक सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. बाळू लोंढे याची या गुन्ह्यातील भूमिका, दारूचा पुरवठा, संबंधित व्यक्ती तसेच या गुन्ह्याची संपूर्ण साखळी याबाबत पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. त्याच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे या प्रकरणातील अन्य आरोपी आणि संबंधितांचे धागेदोरे शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
ओळख लपविण्यासाठी बदलला पेहराव
पोलिसांपासून वाचण्यासाठी बाळू लोंढे याने फरारी काळात आपला पेहराव बदलला होता. नेहमी दाढी-मिशा वाढवून तसेच कपाळावर टिळा लावून वावरणारा बाळू आता दाढी-मिशा काढून आणि मळकट कपडे घालून वावरत असल्याचे तपासात समोर आले आहे.