जगदालपूर, ता. १८ : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील एका दुर्गम गावात सुरक्षा तळाचे रूपांतर केलेल्या पहिल्या जनसुविधा केंद्राचे उद्घाटन केले. अनेक दशकांच्या नक्षलवादी हिंसाचारानंतर नक्षलमुक्त घोषित झालेल्या या राज्यात विकासाचा नवा अध्याय यामुळे सुरू झाला आहे.
राज्यातील नक्षलग्रस्त भागात असलेल्या एकूण १९६ सुरक्षा तळांपैकी ७० तळांचे पुढील दीड वर्षात सेवा केंद्रांमध्ये रूपांतर केले जाईल, असे शहा यांनी यावेळी सांगितले. ‘बस्तर २.०’ या आराखड्याचा हा एक भाग असून, या भागात पुन्हा नक्षलवाद डोके वर काढू नये यासाठी सुरक्षा तळांचा वापर लोककल्याणासाठी केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
देशातून नक्षलवाद संपल्याची घोषणा मार्चमध्ये झाल्यानंतर शहा यांचा हा पहिलाच छत्तीसगड दौरा आहे. त्यांनी नेतनार गावातील ‘सीआरपीएफ’च्या ८० व्या तुकडीच्या ‘ब्राव्हो’ कंपनीच्या आवारात या जनसुविधा केंद्राचे उद्घाटन केले. २०१३ मध्ये हा तळ कार्यान्वित करण्यात आला होता, आता त्यातील काही भाग सेवा केंद्रासाठी देण्यात आला आहे.
या सेवा केंद्रांचे मॉडेल तयार करण्याची जबाबदारी ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन’कडे (एनआयडी) सोपविण्यात आली आहे. ही केंद्रे केवळ शासकीय सेवाच देणार नाहीत, तर स्थानिकांना स्वयंरोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षणही देतील. तसेच, बस्तरमधील सात जिल्ह्यांतील आदिवासींसाठी दुग्ध व्यवसाय आणि वनोपजावर आधारित सहकारी संस्थांचे जाळे विणले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी यावेळी सांगितले की, अमित शहा यांच्या प्रयत्नांमुळे चार दशकांच्या नक्षलवादानंतर बस्तरमध्ये विकासाचे युग सुरू झाले आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री विजय शर्मा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हुतात्मा वीर गुंडाधूर यांच्या नावाने सुरू झालेले हे केंद्र एक क्रांतिकारी पाऊल आहे. एकेकाळी या ठिकाणी नक्षलवाद्यांनी सहा पोलिसांची हत्या केली होती आणि शाळा-रुग्णालये उद्ध्वस्त केली होती. आता आम्ही रायपूरमधील सरकार तुमच्या दारापर्यंत घेऊन येऊ.
- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
या सुविधांचा समावेश
या जनसुविधा केंद्रांच्या माध्यमातून आधार अद्ययावत करणे, बँकिंग, उत्पन्न, जात आणि रहिवासी दाखले, रेशन कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, वीज बिल भरणा आणि रेल्वे-बस तिकीट बुकिंग यांसारख्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.
‘डायल-११२’ सेवेचा प्रारंभ
रायपूर (छत्तीसगड): केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी रायपूर येथील माना पोलीस परेड मैदानावर छत्तीसगड पोलिसांच्या ‘सीजी डायल-११२’ या अत्याधुनिक आपत्कालीन प्रतिसाद सेवेचा आणि मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या ताफ्याचा प्रारंभ केला. मुख्यमंत्री विष्णू देव साय आणि विधानसभा अध्यक्ष रमण सिंह यांच्या उपस्थितीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी ४०० अत्याधुनिक ‘डायल-११२’ आपत्कालीन वाहने आणि ३२ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनना हिरवा झेंडा दाखवला. संपूर्ण राज्यात पुराव्याआधारित तपासाला बळकटी देण्याचा या व्हॅन्सचा हेतू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.