पुणे - रस्ते आणि चौकाचौकांमधील अतिक्रमणांमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडल्याची ओरड होताच, अतिक्रमणांना अधिकारीच जबाबदार असल्याचे सांगून त्यांच्या नावाने गळा काढणारे नगरसेवकच अतिक्रमण कारवाईत खोडा घालत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना गेल्या काही दिवसांत एक-दोन नव्हे; २५ नगरसेवकांनी शिवीगाळ करण्याबरोबर त्यांना धमकविण्याचा प्रताप केल्याचे उघड झाले आहे. नगरसेवकांच्या धाकाने कारवाईची पथके मोकळ्या हाताने परत जात असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे कर्मचाऱ्यांवर हे प्रसंग गुदरत असताना वरिष्ठ अधिकारी मात्र नगरसेवकांचीच मर्जी सांभाळत आहेत. संपूर्ण शहर अतिक्रमणमुक्त करण्याची घोषणा करीत महापालिका प्रशासनाने कारवाईची मोहीम आखली. त्याकरिता नव्याने दीडशेहून अधिक निरीक्षकांची भरती करून यंत्रणा सक्षम केली. अतिक्रमणांसोबतच परवानाधारकांचे पुनर्वसन करण्याच्या योजनेच्या हालचाली वाढल्या. कारवाईला वेग येताच नगरसेवकांचा हस्तक्षेप होऊ लागला. आपल्या प्रभागात कारवाईला येणाऱ्या कर्मचाऱ्यांना हुसकावून लावत अतिक्रमणांना ‘बळ’ देण्याची स्वतंत्र मोहीमच नगरसेवकांनी उघडली आहे.
प्रमुख रस्ते आणि चौकांत हातगाडी, फेरीवाले आणि स्टॉल उभारण्यास बंदी आहे. मात्र, वर्दळीच्या भागात अतिक्रमणे थाटली आहेत. परिणामी, वाहतूक कोंडी होत असल्याचे आढळून आले आहे. ती सुरळीत करण्याचा भाग म्हणून अतिक्रमणे काढण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. तेव्हाच सुमारे २० हजार परवानाधारकांच्या पुनर्वसनाचे उद्दिष्ट ठेवले. त्याआधी अतिक्रमणे हटविण्यावर भर देण्यात आला. मात्र, कारवाईची कुणकुण लागताच नगरसेवक मंडळी पथके रोखण्याची ‘कारवाई’ करीत आहेत. ज्या ठिकाणी बेकायदा हातगाड्या, स्टॉल आहेत, तेथे पथकातील एकही कर्मचारी पोचू दिला जात नाही. दुसरीकडे, अतिक्रमणांवर कारवाई होत नसल्याचा मुद्दा मांडून नगरसेवक सर्वसाधारण सभेत प्रशासनावर टीका करीत असतात. प्रत्यक्षात मात्र, कारवाई रोखण्यात हीच मंडळी पुढे येत असल्याचे दिसून येत आहे.
दंडेलशाहीमुळे कर्मचारी भयभीत
या मोहिमेसाठी अतिक्रमण विभागाने कर्मचाऱ्यांना फौजफाटा वाढविला. त्या तुलनेत महापालिकेकडे जेमतेम पोलिस कर्मचारी आहेत. त्यामुळे पोलिसांविनाच कारवाई करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर येत आहे. त्यात, नगरसेवकांची फोनाफोनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची दंडेलशाही यामुळे कर्मचारी भयभीत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना वरिष्ठांकडून पाठबळ मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. याआधी येरवड्यात कारवाईदरम्यान महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप आणि या विभागाचे प्रमुख माधव जगताप यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.
काही भागांतील कारवाईदरम्यान राजकीय हस्तक्षेप होतो; पण त्याला न जुमानता बेकायदा अतिक्रमणे काढण्यात येत आहेत. तसा आदेश केंद्रीय पथक आणि क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. वर्दळीच्या भागात सतत कारवाई होते. ज्यामुळे रस्ते आणि चौक मोकळे राहतील.
- माधव जगताप, प्रमुख, अतिक्रमण विभाग, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.