कवठे येमाई, ता. १९ : ‘‘मलठण (ता. शिरूर) येथील उजाड गायरान जमिनीवर ग्रामस्थांनी एकत्र येत राबविलेली वृक्षलागवड आणि संवर्धन मोहीम पर्यावरणासाठी आदर्शवत आहे. या उपक्रमाची इतर गावांनीही प्रेरणा घेऊन पडीक जमिनी हिरवाईने फुलवाव्यात,’’ असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी केले.
शिंदेवाडी (मलठण) येथील सुमारे १५ एकर उजाड डोंगराळ गायरान क्षेत्रावर ‘बँक ऑफ बडोदा’ आणि ‘गिव्ह मी ट्रीज’ संस्थेच्या सहकार्याने तब्बल एक लाख वीस हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या वृक्षलागवडीच्या व संवर्धनाच्या कामाची पाटील यांनी पाहणी केली.
यावेळी पाटील म्हणाले की, पडीक व गायरान जमिनीचा पर्यावरणपूरक पद्धतीने वापर करून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केल्यास परिसर हिरवागार होण्यासोबतच भूजलपातळी वाढण्यास, मातीची धूप रोखण्यास आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते. शिंदेवाडी ग्रामस्थांनी लागवडीसोबतच वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली आहे, ही बाब कौतुकास्पद आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे, गटविकास अधिकारी महेश डोके, सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी डी. एल. थोरात, विस्तार अधिकारी बाळासाहेब गावडे, सरपंच माधुरी थोरात, उपसरपंच पोपट साळवे, मुकुंद नरवडे, दादा गावडे, विलास थोरात, नाना फुलसुंदर, किरण शिंदे, अनिल शिंदे, राणी रासकर, चेतन वाव्हळ, संतोष वाव्हळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
योगदानाबद्दल शिंदे यांचा सत्कार
वृक्षांना नियमित पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व्यवस्था केली असून, पंचायत समितीच्या निधीतून शेततळे खोदण्यात आले आहे. तसेच शिंदेवाडी येथील अनिल शिंदे यांनी स्वतःची दोन गुंठे जागा विहिरीसाठी उपलब्ध करून दिली. त्यांच्या योगदानाबद्दल पाटील यांच्या हस्ते शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
02074