पुणे - ‘‘शास्त्रीय संगीतात आता रंजकपणा येऊ लागला आहे. पण, पहिला ख्याल हा भक्कम झालाच पाहिजे. त्यातून तुमचे शिक्षण, विचार आणि रियाज दिसतो. त्यानंतर गायकांनी लोकरंजन करावे. पण, सुरुवातीपासूनच ‘अब क्या सुनाऊ’ असे गायकाने रसिकांना विचारणे योग्य नाही,’’ असे मत शास्त्रीय गायिका कल्पना झोकरकर यांनी व्यक्त केले.
झोकरकर या मूळच्या मध्य प्रदेशातील आहेत. प्रेरणा संगीत महोत्सवासाठी पुण्यात आल्यानंतर त्यांनी ‘सकाळ’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्या म्हणाल्या, ‘‘संगीत महोत्सवाचे स्वरूपही बदलले आहे. आयोजक-प्रायोजकांची आवड त्यात डोकाऊ लागली आहे. त्यांचे ऐकून गायकाला सादरीकरण करावे लागते. आता गर्दी जमविण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या कलाकारांचा संगीत महोत्सवांसाठी विचार केला जातो. ही आयोजकांची गरज असली, तरी जे दडलेले हिरे आहेत, त्यांना शोधणे आणि रसिकांसमोर आणणे हीदेखील आयोजकांची जबाबदारी आहे.’’
गायकाचा संगीत संमेलनात सादरीकरणाचा वेळ कमी होतो आहे; यावर त्या म्हणाल्या, ‘‘सर्वत्रच हा वेळ कमी होतो आहे. कारण, महोत्सवांमध्ये कलाकारांची संख्या वाढत आहे. पण, किमान दीड तास तरी गायकाला मिळायला हवा. खूप वेळ देऊन गाणे ऐकणारा, समज असलेला श्रोताही राहिलेला नाही. त्यासाठी शास्त्रीय संगीताची लोकांमध्ये समज निर्माण करण्याची गरज आहे.’’ शास्त्रीय संगीताला राजाश्रय देऊन सरकारने ते रुजविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मोठ्या गायकांनीही ग्रामीण भागापर्यंत पोचले पाहिजे. टीव्ही वा रिॲलिटी शो यांच्यामुळे संगीताकडे मुले आकर्षित होत आहेत. त्याचा फायदाही होतो आहे. पण, हिंदी कार्यक्रमांमधून विजेती झालेली मुले आज कुठे आहेत? यात चमकलेल्या गायकांनी तेवढ्यावर समाधानी राहू नये. त्यांनी चांगला गुरू शोधून रियाज करावा, गायनाचे शिक्षण घ्यायला हवे, असे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.