मुंबई - ‘‘धायरीतील कालव्यातून पाण्यासह विजेची चोरी होत असल्याच्या प्रकरणाचे पडसाद बुधवारी विधानसभेत उमटले. विजेची चोरी झाल्याची कबुली देत दोषींवर करवाई सुरू आहे. अशा चोऱ्या रोखण्यासाठी भरारी पथकांची संख्या वाढविण्यात येईल,’’ असे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
धायरीत कालव्याला भगदाड पाडून पाण्याची चोरी होत असल्याचे ‘सकाळ’ने उघडकीस आणले होते. त्यासाठी विजेची चोरी केली जात असल्याकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर महावितरणच्या भरारी पथकाने पाहणी आणि तपासणी करून दोघांवर कारवाई केली होती. ‘सकाळ’ने याप्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर महावितरणने शाखा अभियंता आणि तंत्रज्ञ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, पुढे कोणतीच कारवाई झाली नाही. यासंदर्भात आमदार भीमराव तापकीर आणि विजय काळे यांनी लेखी प्रश्न विचारला होता. बुधवारी तो विधानसभेत चर्चेला आला. ‘‘भरारी पथकाने ही करवाई केली.
अधिकारी काय करत होते. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याऐवजी निलंबनाची कारवाई करावी,’ अशी मागणी तापकीर यांनी केली. आमदार नीलेश राणे आणि भारत भेलके यांनी अशा प्रकारे दिवसाढवळ्या विजेची चोरी होत असल्याकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले.
प्रश्नाला खात्याने दिलेल्या लेखी उत्तरातील त्रुटींकडे लक्ष वेधून चुकीची माहिती सभागृहाला दिल्याचा आरोप विजय काळे यांनी केला.
काळे म्हणाले, ‘‘वेळेवर वीजबिल का दिले जात नाही. किती महिन्यांनी बिल दिले जातात. आशा पाणी चोरांमुळे पुणे शहराला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. कालव्याच्या बाजूने पाणी चोरण्यासाठी होणारी विजेची चोरी रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार आहात.’’
धायरीतील शेतीपंपासाठी वीजजोड दिला होता. परंतु, त्याचा वापर व्यावसायिक कारणासाठी केला जात होता. शेती मीटर असल्यामुळे त्याची नियमित तपासणी होत नाही. तसेच दरमहा बिलही दिले जात नाही. याप्रकरणात कारवाई केली आहे. सध्या महावितरणकडे ४२ पथके आहेत. ती आणखी वाढविण्यात येतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.