From name of the play Godse Vs Godse Uday Dhurat run in court against Sharad Ponkshe Sakal
पुणे

Pune News : नाटकाच्या नावावरून ‘गोडसे विरुद्ध गोडसे’

शरद पोंक्षे यांच्याविरोधात उदय धुरत यांची न्यायालयात धाव

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकावरून पुन्हा वादाचा प्रयोग रंगला आहे. निर्माते उदय धुरत ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक नव्या संचासह पुन्हा रंगभूमीवर आणत असतानाच ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे हे ‘नथुराम गोडसे बोलतोय’ अशा शीर्षकाच्या नाटकाचे प्रयोग सुरू करीत आहेत. पोंक्षे यांनी नाटकाचे शीर्षक व संहिता चोरल्याचा आरोप करत धुरत यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

शीर्षकातील नामसाधर्म्यामुळे प्रेक्षकांची दिशाभूल होत असून मूळ नाटकाच्या लोकप्रियतेचा फायदा उठविण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप धुरत यांनी केला. ‘‘आम्ही मूळ नाटक परत आणत असल्याची जाहिरात पाहून पोंक्षे यांनी नव्या नाटकाची घोषणा केली. मूळ शीर्षकातील केवळ एक शब्द काढून त्यांनी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची मंजुरी मिळविली.

एवढ्या मोठ्या कलाकाराला एका ज्येष्ठ नाटककाराच्या शीर्षकाची गरज का भासली? मूळ नाटकातील ६० टक्के संहिताही त्यांनी चोरली आहे. हा प्रकार अतिशय निंदनीय आणि घृणास्पद आहे. या नाटकाचे प्रयोग त्वरित थांबवण्यात यावे, या मागणीसाठी आम्ही न्यायालयात दाद मागितली आहे,’’ असे धुरत यांनी स्पष्ट केले.

या आरोपांचा इन्कार करताना पोंक्षे म्हणाले, ‘‘मी २०१६ मध्येच माझ्या संहितेसाठी ‘नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाव मिळावे, असा अर्ज रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडे केला होता. त्यावेळी आधीच्या नाटकाच्या निर्मात्यांनी आक्षेप घेतल्यामुळे मी ‘हे राम नथुराम’ या नावाने प्रयोग केले. मात्र या निर्मात्यांनी पुढील १५ दिवसांत नाव त्यांचे असल्याचा पुरावा दिला नाही, तर ते नाव मला परत मिळावे, असेही म्हटले होते.

गोडसे कुटुंबीयांनी आणि रसिकांनी आग्रह केल्यामुळे मी प्रयोग सुरू करायचा निर्णय घेतला. आजवर त्या निर्मांत्यानी ‘नथुराम गोडसे बोलतोय’ या नावाबाबत कोणताही पुरावा सादर केलेला नाही. त्यामुळे मी अर्ज केल्यावर संहिता आणि शीर्षकाची रीतसर परवानगी मिळाली. अशावेळी आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. मला केवळ ५० प्रयोग चांगल्या पद्धतीने करायचे आहेत.’’

नाटकाचा इतिहास काय?

प्रसिद्ध नाटककार प्रदीप दळवी लिखित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक माऊली प्रॉडक्शनतर्फे उदय धुरत यांनी १९९८ मध्ये रंगभूमीवर आणले होते. या नाटकाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक विनय आपटे यांनी केले होते. पोंक्षे यांनीच नथुराम गोडसे यांची मुख्य भूमिका साकारली होती. सुमारे ८१७ प्रयोगांनंतर २०१८ मध्ये हे नाटक थांबवण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. त्यानंतर २०२३ मध्ये हेच नाटक नव्या संचात सुरू करण्याची घोषणा धुरत यांनी केली.

यातील नथुराम गोडसेच्या भूमिकेसाठी अभिनेता सौरभ गोखले याचे नावही निश्चित करण्यात आले. विवेक आपटे दिग्दर्शन करीत असून तालमींनाही प्रारंभ झाला आहे. मात्र, दरम्यानच्या काळात पोंक्षे यांनीही ‘नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक रंगभूमीवर आणण्याची घोषणा केली. लेखन-दिग्दर्शन व प्रमुख भूमिका पोंक्षे यांचीच आहे.

निर्मिती त्यांनी व प्रमोद धुरत यांनी केली आहे. विशेष म्हणजे, प्रेक्षकांच्या आग्रहास्तव नाटक रंगभूमीवर घेऊन येत असून याचे केवळ निवडक ५० प्रयोगच केले जातील, असेही पोंक्षे यांनी जाहीर केले आहे. लवकरच प्रयोगांना प्रारंभ होणार आहे.

स्थगितीस नकार

मुंबई उच्च न्यायालयाने शरद पोंक्षे यांच्या नाटकाच्या प्रयोगांना स्थगिती देण्यास नकार दिला. मात्र त्यांच्या नाटकाचे चित्रीकरण करण्याची परवानगी धुरत यांना दिली आहे. १३ ऑक्टोबरला पोंक्षे आपली बाजू मांडणार आहेत. त्यानंतर १९ ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT