नदी आटली, शेतकऱ्यांचे डोळे पाणावले!
गडहिंग्लजमधील चित्र ः शेतीसाठी शेवटचे आवर्तन, शिल्लक पाणी पिण्यासाठीच
गडहिंग्लज, जि. कोल्हापूरः एकीकडे हिरण्यकेशी नदी आटली असून दुसरीकडे शेती पिकांची अवस्था पाहून शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. पिण्याच्या पाणी योजनांच्या जॅकवेलना पाणी पुरेनासे झाले आहे. गेल्या आठवड्यापासून नदीपात्रातील वाळू दिसत आहे. उन्हाच्या चटक्याने पिकांची तहान वाढत असल्याने उपसा मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी वेळेआधीच नदीपात्र ठिकठिकाणी कोरडे पडले आहे. निलजी बंधाऱ्याखालील कर्नाटक हद्दीतील शेतकऱ्यांनी लाभक्षेत्राबाहेर करणाऱ्या पाणी उपशावर पाटबंधारेचे नियंत्रण नसल्याने चारच दिवसांत पात्र रिकामे होते. त्याचा परिणाम महाराष्ट्र हद्दीतील पाणी योजना व शेतीच्या पाण्यावर होतो. आठ दिवसांपासून जॅकवेलना पाणी पुरत नाही. कडाक्याच्या उन्हात पिकांची तहान वाढली आहे.आंबेओहोळ प्रकल्पातील पाणी तीन वर्षांपासून लाभक्षेत्रापुरतेच दिले जात आहे. या प्रकल्पात दरवर्षी साधारण ७० टक्के साठा शिल्लक राहतो. यंदाही धरणात आजअखेर ६९ टक्के पाणीसाठा आहे. मॉन्सून लांबला तर चित्रीचे पाणी कमी पडेल. त्यामुळे आंबेओहोळच्या पाण्यावर लोकांच्या आशा आहेत; परंतु यातील पाणी देण्याचा अधिकार स्थानिक अधिकाऱ्यांकडे नाही. सर्फनाला प्रकल्पातही पाणीसाठा असला तरी वळीव पाऊस झाला नाही व उन्हाचे प्रमाण वाढले तर पाटबंधारेला लाभधारक शेतकरी व गावांचा विचार करावा लागेल. परिणामी, चित्री लाभधारकांत चिंतेचे सावट आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.