पुणे - भारताच्या वैभवशाली इतिहासाचे सखोल संशोधन आणि अभ्यास आजही पूर्ण झालेला नाही. तसेच, त्याचा प्रत्यक्ष उपयोग आपण म्हणावा तसा करवून घेतला नाही, अशी खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था आणि स्नेहल प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित झालेल्या ‘शिवराज भूषण’ ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, ग्रंथाचे लेखक डॉ. केदार फाळके, माजी खासदार प्रदीप रावत, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, डॉ. गो. बं. देगलूरकर, ॲड. सदानंद फडके व स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे उपस्थित होते.
बाबासाहेब पुरंदरे यांचा ‘पद्मविभूषण’ पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने या वेळी सत्कार करण्यात आला. पुरंदरे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे शौर्याबरोबरच विलक्षण प्रतिभा आणि बुद्धिमत्तादेखील होती. केवळ उपचार म्हणून शिवजयंती साजरी न करता महाराजांना समजून घेऊन त्यांच्या जीवनातील छोट्या-मोठ्या प्रसंगांचा अंगीकार करण्याची नितांत आवश्यकता आहे.’’
डॉ. फाळके म्हणाले, ‘‘या ग्रंथासाठी १४ हस्तलिखितांची नोंद घेतलेली आहे. या सगळ्याचा पुरेसा अभ्यास करून हा ग्रंथ साकारला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, त्यांचे शौर्य, पराक्रम, बुद्धिमत्ता या सर्वांचे अत्यंत स्पष्टपणे कवी भूषणने एका अर्थाने चित्रण केले आहे.’’
रावत म्हणाले, ‘‘आज संपूर्ण भारतात शालेय शिक्षणात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत म्हणावी तेवढी माहिती दिली जात नाही. आज चांगले संशोधक आणि वस्तुनिष्ठ इतिहासकारांची कमतरता जाणवत आहे.’’
फिरोदिया म्हणाले, ‘‘भांडारकर संस्थेत दुर्मीळ हस्तलिखिते, ग्रंथसंपदा आहे. याचा सर्वांनी उपयोग करून घ्यावा. हे साहित्य जपण्याची गरज असून, त्यासाठी भव्य संग्रहालय उभे केले जाणार असल्यास भरघोस निधी देण्याची आमची तयारी आहे.’
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.