पुणे

सशक्त भारत, सुरक्षित सीमा - प्रज्वल रामटेके

CD

दखल
सशक्त भारत, सुरक्षित सीमा
- प्रज्वल रामटेके
--------------------------------------------
लीड
परकीय देशांवर आणि आयात केलेल्या शस्त्रास्त्रांवर विसंबून न राहता, भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांत (लष्कर, हवाईदल आणि नौदल) आता स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक शस्त्रे दाखल होत आहेत. २०२५-२०२६ या काळात भारतीय सैन्यात मोठ्या प्रमाणात नवी ‘ब्रह्मास्त्रे’ दाखल झाली आहेत. यामुळे भारताची सामरिक ताकद कैकपटीने वाढली आहे. येत्या राष्ट्रीय सशस्त्र सेना दिनानिमित्त...
--------------------------------------------

युद्ध आता केवळ सीमेवरील काटेरी कुंपणापुरते मर्यादित न राहता, आजचे युद्ध तंत्रज्ञानाच्या वेगाने आकाशात, सायबर जगात आणि समुद्राच्या अतिखोल तळाशीही घोंघावत आहे. रशिया-युक्रेन, इस्राईल-हमास, इस्राईल-अमेरिका-इराण यांच्यात सध्या सुरू असलेल्या संघर्षाने जगाला एक मोठा धडा दिला आहे, तो म्हणजे केवळ सैनिकांची मोठी संख्या आणि पारंपरिक शस्त्रे आता युद्ध जिंकून देऊ शकत नाहीत. आधुनिक युद्ध जिंकण्यासाठी अचूकता, वेग, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि हाय-टेक तंत्रज्ञानाची नितांत गरज आहे.

भारताची भौगोलिक परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची आहे. एका बाजूला विस्तारवादी धोरण राबवणारा आणि सीमेवर सतत कुरघोड्या करणारा चीन, तर दुसऱ्या बाजूला दहशतवादाला खतपाणी घालणारा पाकिस्तान आहे. अशा ‘टू-फ्रंट वॉर’सारख्या (दोन्ही आघाड्यांवर युद्ध) संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी देशाला केवळ बचावात्मक राहून चालणार नाही, तर शत्रूला त्याच्याच हद्दीत धडकी भरवण्याची ताकद निर्माण करावी लागेल. ही गरज ओळखून गेल्या काही वर्षांत ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ मोहिमांतर्गत भारताने संरक्षण क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती घडवून आणली आहे.

परकीय देशांवर आणि आयात केलेल्या शस्त्रास्त्रांवर विसंबून न राहता, भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांत (लष्कर, हवाईदल आणि नौदल) आता स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक शस्त्रे दाखल होत आहेत. २०२५-२०२६ या काळात भारतीय सैन्यात मोठ्या प्रमाणात नवी ‘ब्रह्मास्त्रे’ दाखल झाली आहेत. यामुळे भारताची सामरिक ताकद कैकपटीने वाढली आहे.

अण्वस्त्र क्षमतेत ‘अग्नी’ची ऐतिहासिक भरारी
सैन्याला युद्धात उतरण्याआधी शत्रूला मानसिक पातळीवर हरवणे अत्यंत महत्त्वाचे असते. यासाठी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (एसएफसी) काम करते. त्यांच्याकडे भारताची अण्वस्त्रे हाताळण्याची मोठी जबाबदारी असते. गेल्या एका वर्षात भारताने या आघाडीवर जगाला थक्क करणारी कामगिरी केली आहे.

१. अग्नी-५ आणि ‘मिशन दिव्यास्त्र’ : अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेले अग्नी-५ हे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (आयसीबीएम) भारताकडे आधीपासूनच होते. मात्र, गेल्या वर्षभरात भारताने यात मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेइकल (एमआयआरव्ही) तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला आहे. या मोहिमेला ‘मिशन दिव्यास्त्र’ असे नाव देण्यात आले. पूर्वी एका क्षेपणास्त्रातून केवळ एकच बॉम्ब (वॉरहेड) डागता येत असे. आता अग्नी-५मधून एकाच वेळी अनेक अण्वस्त्रे डागता येतात आणि ती शत्रूच्या वेगवेगळ्या शहरांवर किंवा लक्ष्यांवर एकाच वेळी अचूक मारा करू शकतात. यामुळे शत्रूची क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा पूर्णपणे गोंधळून जाते आणि हल्ला रोखणे अशक्य होते. पाच हजार किलोमीटरहून अधिक पल्ला असलेल्या या क्षेपणास्त्रामुळे संपूर्ण चीन, युरोपचा काही भाग आणि आशिया खंडाचा बहुतांश प्रदेश भारताच्या थेट टप्प्यात आला आहे. ही भारताची आतापर्यंतची सर्वात मोठी सामरिक झेप मानली जात आहे.

लष्कर : सीमेवरील ‘अभेद्य’ भिंत आणि स्मार्ट युद्धतंत्र
जगातील सर्वात मोठ्या आणि ताकदवान सैन्यांपैकी एक असलेल्या भारतीय लष्कराने आता केवळ पारंपरिक शस्त्रांचीच नव्हे, तर ‘स्मार्ट वॉरफेअर’ची कास धरली आहे. दुर्गम पर्वत, वाळवंट आणि जंगलांमध्ये लढणाऱ्या आपल्या सैनिकांच्या खांद्यावरील ओझे कमी करत त्यांना तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यावर लष्कराने भर दिला आहे.

१. हलका रणगाडा ‘झोरावर’ : गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर पूर्व लडाखमध्ये अतिउंचीवरील प्रदेशात चीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी वेगाने पोहोचू शकणाऱ्या रणगाड्यांची नितांत गरज होती. भारताकडे असलेले रशियन बनावटीचे टी-९० आणि टी-७२ रणगाडे अत्यंत ताकदवान असले, तरी त्यांचे वजन ४५ ते ५० टनांच्या घरात आहे. त्यामुळे ते हिमालयाच्या अतिउंचीवर नेणे आणि वेगाने हलवणे कठीण जाते. या समस्येवर मात करण्यासाठी डीआरडीओ आणि एल अँड टी यांनी अवघ्या २५ टनांचा ‘झोरावर’ हा स्वदेशी हलका रणगाडा विकसित केला. वजनाने हलका असल्याने भारतीय वायुदलाची विमाने हा रणगाडा सहजपणे लडाखच्या डोंगराळ भागात पोहोचवू शकतात. विशेष म्हणजे, यामध्ये ड्रोन इंटिग्रेशनची सुविधा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला आहे. चीनच्या टाइप १५ या हलक्या रणगाड्यांना भारताचे हे सडेतोड उत्तर आहे.

२. ‘नागास्त्र-१’ ड्रोन : आधुनिक युद्धात ड्रोन्सचे महत्त्व वादातीत आहे. भारताने इस्राईल आणि इतर देशांवरील अवलंबित्व कमी करत आता नागपूरच्या सोलर इंडस्ट्रीजने तयार केलेले नागास्त्र-१ हे स्वदेशी आत्मघाती ड्रोन लष्करात दाखल केले आहे. हे ‘लॉइटरिंग म्युनिशन’ प्रकारातील ड्रोन आहे. हा ड्रोन आकाशात बराच काळ घिरट्या घालत राहतो, टार्गेट निश्चित करतो आणि संधी मिळताच स्वतःला शत्रूच्या तळावर किंवा रणगाड्यावर आदळून स्फोट घडवून आणतो. सैनिकांना धोका न पत्करता थेट शत्रूच्या छावणीत घुसून हल्ला करण्याची ही पद्धत अत्यंत प्रभावी ठरत आहे.

३. मॅन-पोर्टेबल अँटी-टँक गाइडेड मिसाइल (एमपीएटीजीएम) : शत्रूचे रणगाडे काही सेकंदात भस्मसात करण्यासाठी १५ किलोपेक्षा कमी वजनाचे हे क्षेपणास्त्र जवानांसाठी गेमचेंजर ठरत आहे. हे नवीन स्वदेशी क्षेपणास्त्र सैनिक सहज आपल्या खांद्यावरून वाहून नेऊ शकतात. हे ‘फायर अँड फरगेट’ तंत्रज्ञानावर आधारित आहे, म्हणजेच एकदा टार्गेट लॉक करून फायर केले, की जवानाला तिथे थांबण्याची गरज नसते, क्षेपणास्त्र स्वतः त्याचा पाठलाग करून टार्गेट नष्ट करते.

४. सीक्यूबी कार्बाइन्स आणि रायफल्स : शहरी भागात, इमारतींमध्ये किंवा जंगलात दहशतवाद्यांशी अगदी जवळून दोन हात करताना सैनिकांना हलक्या आणि वेगवान शस्त्राची गरज असते. त्यामुळे जवानांना अधिक सक्षम करण्यासाठी भारतीय लष्कराने ४ लाख २५ हजार नव्या सीक्यूबी कार्बाइन्सचा करार केला आहे. जुन्या ‘स्टर्लिंग’ बंदुकीची जागा या नव्या हलक्या आणि अत्यंत घातक रायफल्स घेणार आहेत. या रायफल्सचे उत्पादन भारतातच स्वदेशी कंपन्यातर्फे करण्यात येत आहे. यामुळे जवानांची चपळता आणि मारक क्षमता वाढली आहे.

हवाईदल : आकाशावर निर्विवाद आणि तंत्रशुद्ध वर्चस्व
‘आधुनिक युद्धात ज्याचे आकाशावर वर्चस्व, त्याचाच युद्धात विजय,’ हे सूत्र लक्षात घेऊन भारतीय हवाईदलाने आपली हवाई ताकद अधिकच प्रगत केली आहे. वायूशक्ती-२०२६च्या सरावातून वायुदलाने हे सिद्धही केले आहे.

१. तेजस मार्क-१ए : अनेक दशकांपासून भारतीय वायुदलाचा कणा राहिलेली मिग-२१ लढाऊ विमाने आता निवृत्त होत आहेत. त्यांची जागा स्वदेशी तेजसचे अत्याधुनिक रूप ‘मार्क-१ए’ घेत आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून या विमानांच्या तुकड्या वायुदलात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. या नवीन तेजसमध्ये ॲक्टिव्ह इलेक्ट्रॉनिकली स्कॅन्ड ॲरे (एईसीए) रडार, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट आणि हवेतून हवेत मारा करणारी ‘अस्त्र’सारखी अत्यंत घातक स्वदेशी क्षेपणास्त्रे जोडण्यात आली आहेत. परिणामी, हे विमान आकाशात एक घातक शिकारी म्हणून वावरतात.

२. ‘समर’ हवाई संरक्षण प्रणाली : भारतीय अभियंत्यांच्या कल्पकतेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ‘समर’. कालमर्यादा संपत आलेल्या रशियन आर-७३ आणि आर-७२ क्षेपणास्त्रांचा प्रभावी पुनर्वापर करत, हवाईदलाने त्यांना स्वदेशी रडार आणि सॉफ्टवेअरच्या साहाय्याने जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या प्रणालीत रूपांतरित केले. कमी खर्चात विकसित झालेली ही प्रणाली शत्रूची विमाने, हेलिकॉप्टर्स आणि ड्रोन्स अचूकपणे पाडण्यास सक्षम आहे.

३. अपाचे हेलिकॉप्टर्स (एएच-६४ई अपाचे) : जगातील सर्वात घातक आणि ‘उडता रणगाडा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘अपाचे’ ॲटॅक हेलिकॉप्टर्सची नवीन तुकडी हवाई दलात दाखल झाली आहे. पाकिस्तानच्या सीमेजवळ वाळवंटी भागात रणगाड्यांच्या ताफ्यांवर हवाई हल्ले करण्यासाठी आणि रात्रीच्या अंधारातही अचूक ऑपरेशन करण्यासाठी ही हेलिकॉप्टर्स भारतीय हवाईदलासाठी अत्यंत मोलाची आहेत.

४. सी-२९५ ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट : युद्धकाळात सीमेवर तातडीने रसद, शस्त्रे आणि सैनिकांना पोहोचवणे ही सर्वात कठीण कामे असतात. हवाईदलातील जुन्या ‘अँटोनोव्ह-३२’ विमानांची जागा ‘सी-२९५’ विमाने घेत आहेत. तसेच टाटा समूह आणि एअरबस यांच्या संयुक्त विद्यमाने गुजरातमधील वडोदरा येथे आता स्वदेशी ‘सी-२९५’ विमाने तयार होत आहेत. खासगी क्षेत्रातील भारतातील हा पहिलाच मोठा विमान बांधणी प्रकल्प आहे.

नौदल : भारताचा समुद्रातील वाढता दबदबा
चीनने भारताला घेरण्यासाठी हिंदी महासागरात ‘स्ट्रिंग ऑफ पर्ल्स’ ही रणनीती अवलंबली आहे. श्रीलंका, जिबूती, पाकिस्तानचे ग्वादर बंदर अशा विविध ठिकाणी चीन नौदल तळ उभारत आहे. चीनचा समुद्रातील वाढता हस्तक्षेप मोडून काढण्यासाठी आणि महासागरावर नियंत्रण मिळविण्यासाठी भारतीय नौदलाचे आधुनिकीकरण सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

१. अण्वस्त्रवाहू पाणबुडी ‘आयएनएस अरिदमन’ : कोणत्याही देशाची सर्वात मोठी ताकद त्याच्या न्युक्लिअर ट्रायडमध्ये (जमीन, हवा आणि पाण्याखालून अण्वस्त्र हल्ला करण्याची क्षमता) असते. पाण्याखालून थेट अण्वस्त्र हल्ला करण्याची क्षमता असणारी अरिहंत क्लासची दुसरी आणि अधिक प्रगत अण्वस्त्रवाहू पाणबुडी (एसएसबीएन) ‘आयएनएस अरिदमन’ नौदलाच्या ताफ्यात सक्रिय होण्याच्या मार्गावर आहे. समुद्राच्या अंधाऱ्या तळाशी महिनोन्महिने शत्रूच्या रडारला चकवा देऊन लपून राहण्याची या पाणबुडीची क्षमता भारताला अत्यंत प्रबळ ‘सेकंड स्ट्राइक कॅपेबिलिटी’ (दुसऱ्यांदा हल्ला करण्याची क्षमता) देते.

२. एमएच-६०आर ‘सीहॉक’ (रोमिओ) हेलिकॉप्टर्स : पाण्याखाली अत्यंत शांतपणे दडून बसलेल्या शत्रूच्या पाणबुड्या शोधणे हे महासागरातील सर्वात आव्हानात्मक काम असते. हीच अडचण दूर करण्यासाठी अमेरिकेकडून घेतलेली आणि पाणबुड्यांचा कर्दनकाळ मानली जाणारी ‘रोमिओ’ हेलिकॉप्टर्सची तुकडी नौदलात पूर्णपणे कार्यरत झाली आहे. अत्याधुनिक सोनार सिस्टीम आणि टॉर्पेडोजनी सज्ज असलेली ही हेलिकॉप्टर्स समुद्रात भारताचे डोळे आणि कान म्हणून काम करत आहेत.

३. नीलगिरी क्लास स्टेल्थ फ्रिगेट्स : प्रोजेक्ट १७ए अंतर्गत नौदलात नव्याने दाखल झालेल्या ‘आयएनएस हिमगिरी’ आणि ‘उदयगिरी’ हे फ्रिगेट्स समुद्रावरील युद्धाचे नियम बदलत आहेत. या युद्धनौका अत्याधुनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्रे आणि रडार सिस्टीमने सज्ज आहेत. त्यांच्या विशिष्ट स्टेल्थ डिझाईनमुळे त्या शत्रूच्या रडारवर केवळ एका लहान मासेमारी नौकेसारख्या दिसतात. त्यामुळे शत्रूला त्यांच्या विशाल आकाराचा आणि ताकदीचा अंदाज येत नाही.

४. स्वार्म ड्रोन्स आणि शॅलो वॉटर क्राफ्ट्स : ज्याप्रमाणे मधमाश्यांचा थवा एकत्र हल्ला करतो, तसेच हे तंत्रज्ञान आहे. किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी विनामानव चालणाऱ्या शस्त्रास्त्रांनी सज्ज बोटींचा ताफा (ऑटोनॉमस वेपनाइज्ड बोट स्वार्म्स) नौदलात दाखल झाला आहे. हे सर्व ड्रोन्स एकमेकांशी संवाद साधून शत्रूच्या जहाजावर चारही बाजूंनी एकाच वेळी हल्ला करतात. सोबतच ‘आयएनएस माहे’, ‘आयएनएस अर्नाला’ यांसारख्या छोट्या पण अत्यंत घातक ‘अँटी-सबमरीन’ युद्धनौका किनाऱ्याजवळील सुरक्षेसाठी तैनात करण्यात आल्या आहेत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs GT Live : १९ वर्षीय समीक्षाने तयार केलेली जर्सी घालून राजस्थान रॉयल्स खेळणार! जाणून घ्या त्या मागची स्पेशल स्टोरी

सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांची आता खैर नाही; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सोशल मीडिया कायदा येणार?

RR vs GT Live : यशस्वी जैस्वाल, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार! रियान पराग संघाबाहेर का? व्हॅपिंग प्रकरण भोवले की आणखी काही?

IPL 2026 MI vs RCB : मुंबई इंडियन्स उद्या न खेळताच स्पर्धेबाहेर होणार? महत्त्वाचे अपडेट्स, RCB विरुद्धच्या लढतीपूर्वी वातावरण बिघडले

Crime: तोंडात कापड कोंबले, हातपाय दोरीने बांधले, महिलेला निर्घृणपणे संपवले, २ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT