आळंदी, ता. २२ : ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्यात रविवारी (ता. २२) भोसरी शाखेच्या माध्यमातून चऱ्होली आणि आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या घाटांवर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आळंदी आणि चऱ्होली खुर्द ग्रामपंचायत हद्दीत इंद्रायणी नदीची स्वच्छता करण्यात आली. यावेळी आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर, सागर कुऱ्हाडे तसेच मिशनचे सेवादार उपस्थित होते. यावेळी आळंदीतील इंद्रायणी नदीपात्र तसेच स्मशानभूमी, इंद्रायणीच्या पुलाखाली असलेला सर्व जलपर्णीयुक्त कचरा, कपडे, प्लास्टिकच्या वस्तू नदीपात्रातून बाहेर काढण्यात आल्या.
याचबरोबर चऱ्होली खुर्द ग्रामपंचायत हद्दीतही इंद्रायणी नदी पात्राची स्वच्छता मोहीम या स्वच्छता दूतांच्या मार्फत करण्यात आली. पुरुष आणि महिला एकत्रितपणे नदीपात्रात उतरून सफाई केली. सुमारे ४०० स्वच्छता दूत इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी एकत्रित आले होते. जमा झालेला सर्व नदीपात्रातील कचरा ट्रॅक्टर साह्याने एकत्रितपणे घनकचरा व्यवस्थापन केले. स्वच्छता अभियान झाल्यानंतर त्याच ठिकाणी सत्संगही झाला.