आंबेगाव, ता. १७ : आंबेगाव खुर्द परिसरातील वाढते नागरीकरण आणि प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, कोरोना काळात बंद झालेली जांभूळवाडी ते शिवाजीनगर ही पीएमपी बससेवा तातडीने पूर्ववत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सध्या या मार्गावर जांभूळवाडी ते स्वारगेट (बस क्र. २९०) ही एकमेव सेवा सुरू आहे. मात्र, लिपाणे वस्ती, विठ्ठलनगर, सिद्धिविनायक सोसायटी आणि जांभूळवाडी परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे या बसवर प्रचंड ताण येत आहे. थेट शिवाजीनगर किंवा मंडईला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा दुसरा पर्याय नसल्याने नोकरदार, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. याबाबत चंद्रकांत गुरव यांनी पीएमपी प्रशासनाला ई-मेलद्वारे निवेदन पाठवले आहे.