‘महामार्ग’च्या अधिकाऱ्यांची कऱ्हाडला बैठक
तासवडे-शिरवडे रस्त्यासंदर्भात बाळासाहेब पाटलांच्या सूचना
कऱ्हाड, ता. १२ ः पुणे- बंगळूर महामार्गावरील तासवडे टोलनाक्यापासून तासवडे - शिरवडेकडे जाणाऱ्या रस्त्याची उंची कमी करून रुंदीकरण, खडीकरण व डांबरीकरण करावे, महामार्गावरील विविध ठिकाणचे सेवा रस्ते, पूल, गटार आदी कामे तातडीने पूर्ण करून वाहनधारक, नागरिकांची गैरसोय थांबवावी, अशी मागणी माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.
महामार्गाचे काम आणि तासवडे टोल नाका परिसरातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या गैरसोयी दूर करण्यासंदर्भात महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत श्री. पाटील यांची बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक संजय कदम, प्राधिकरण अभियंता महेश पाटोळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी आर. बी. धुमाळ, अदानी रोड ट्रान्स्पोर्टचे राजेश खत्री, प्रकल्प प्रमुख प्रशांत कुलकर्णी, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित पाटील -चिखलीकर, पंचायत समितीचे माजी सभापती प्रणव ताटे, राष्ट्रवादी युवकचे उत्तर तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, दक्षिणचे अध्यक्ष पांडुरंग चव्हाण, जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक संजय साळुंखे, संजय थोरात, संग्रामसिंह जाधव पाटील, डी. बी. जाधव, आर. जी. तांबे, प्रताप चव्हाण आदी उपस्थित होते.
श्री. पाटील यांनी प्रारंभी अधिकाऱ्यांकडून कामासंदर्भातील माहिती घेतली. त्यानंतर तासवडे टोलनाक्यापासून तासवडे, शिरवडेकडे जाणाऱ्या रस्त्याची उंची वाढवल्याने गावातील लोकांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे रस्त्याची उंची कमी करून रुंदीकरण, खडीकरण व डांबरीकरण करावे. महामार्गावरील कामाची मुदत संपूनही कामे सुरू आहेत. अजूनही अनेक ठिकाणचे सेवा रस्ते, पूल, गटर्स आदी कामे अपूर्ण आहेत. पावसाळ्यापूर्वी ती कामे पूर्ण करून वाहनधारक, नागरिकांना दिलासा द्यावा, अशा सूचना केल्या.
W18463
कऱ्हाड ः महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना बाळासाहेब पाटील. त्यावेळी प्रणव ताटे, अजित पाटील, प्रशांत यादव आदी.
..........................................