कुरकुंभ, ता. २२ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील दौंड ते बारामती या वर्दळीच्या मार्गावर असलेल्या श्री फिरंगाई माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाजवळ विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या ठिकाणी रस्त्याला तीव्र उतार आणि धोकादायक वळण असल्याने वाहनचालकांना रस्ता ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांचा अंदाज येत नाही. वळणाला वाहनांचा वेग कमी होत नसल्याने, येथे तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी ग्रामस्थ आणि शिक्षकांनी केली आहे.
दौंड-बारामती रस्ता हा मुख्य मार्ग असल्याने येथे दिवस-रात्र अवजड वाहनांची वर्दळ असते. ज्या ठिकाणी शाळा आहे, तिथेच रस्त्याला मोठा उतार असून पुढे लगेच वळण लागते. उतारामुळे वाहने सुसाट वेगाने येतात आणि वळणामुळे समोरून येणारे विद्यार्थी चालकांना दिसत नाहीत. शाळा भरताना आणि सुटताना विद्यार्थी रस्ता ओलांडत असतात, अशा वेळी भीषण अपघाताची टांगती तलवार सतत कायम असते.
ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीने या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. उतारावर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी केवळ फलक पुरेसे नसून, प्रत्यक्ष गतिरोधक किंवा रंबल स्ट्रिप्स असणे आवश्यक असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
‘‘विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना आम्हाला जीव मुठीत धरून उभे राहावे लागते, एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने येथे गतिरोधक आणि सूचना फलक लावावेत,’’ अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.