जुन्नर, ता. १० : तालुक्यातील अतिदुर्गम हातवीज परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, गेल्या पंधरा दिवसांत दोन गाई आणि एका बैलाची शिकार केली आहे. या वाढत्या उपद्रवामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी सरपंच महादू निर्मळ यांनी केली आहे. तालुक्यातील आंबे, हातवीज, हिवरे पठार आणि सुकाळवेढे या पठारी भागांत बिबट्याचा वावर वाढला आहे. या परिसरात दाट झाडी असल्याने बिबट्याला लपण्यासाठी अनुकूल जागा मिळते. अनेक शेतकऱ्यांकडे पक्के गोठे नसल्याने जनावरे अंगणात बांधली जातात, ज्याचा फायदा बिबट्या घेत आहे. हातवीज येथे झालेल्या नुकसानीमुळे स्थानिक शेतकरी हवालदिल झाले असून, वनविभागाने या हिंस्र प्राण्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.