५१०२२
फोटो
मां शारदामायी सूक्त
संघर्षातून धम्मप्रकाशाकडे नेणारा प्रवास
श्रीमती शारदा अंबादास शिंदे (शारदामायी) यांच्या तब्बल सात दशकांच्या अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनप्रवासाचा वेध ‘मां शारदामायी सूक्त’ या ३४० पानांच्या पुस्तकातून घेण्यात आला आहे. प्रतिकूल ग्रामीण पार्श्वभूमी आणि जाचक रूढी-परंपरांवर मात करत एका सामान्य शिक्षिकेने स्वतःच्या आणि समाजाच्या आयुष्यात घडवून आणलेल्या सकारात्मक परिवर्तनाची ही गाथा आहे.
शारदामायी आणि त्यांचे पती अंबादास शिंदे यांनी केवळ स्वतःपुरता विचार न करता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन आयुष्य समाजकार्यासाठी वेचले. १९८५ मधील ‘बंडखोर’ वृत्तपत्र, बहुजन वसतिगृह, समता प्रेस आणि अनाथ मुलींचे विवाह यांसारख्या उपक्रमांतून त्यांनी समाजप्रबोधन केले. अजिंठा-वेरूळसह कान्हेरी, कार्ले, भाजे यांसारख्या दुर्लक्षित बौद्ध लेण्यांचे संशोधन आणि थायलंड, श्रीलंका, लुंबिनी अशा आंतरराष्ट्रीय धम्मयात्रांचे महत्त्व त्यांनी पुस्तकातून समाजासमोर आणले.
जिजाऊ, सावित्रीबाई, अहिल्यादेवी आणि माता रमाई यांचा आदर्श जपणाऱ्या शारदामायी यांनी बुद्धांचे चार आर्यसत्य आणि अष्टांगिक मार्ग प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणले. गंभीर आजाराच्या प्रसंगीही बुद्धांच्या शिकवणीमुळे त्यांनी अत्यंत शांतपणे आणि धैर्याने अंतिम क्षणांना सामोरे जात निर्वाण स्वीकारले.
स्वतः ज्योत होऊन इतरांच्या आयुष्यात प्रकाशाची नवी पहाट आणणाऱ्या शारदामायींचे हे चरित्र आजच्या तरुण स्त्रिया आणि मुलींसाठी जीवन जगण्याचा खरा दीपस्तंभ ठरेल.
- कवयित्री सुवर्णा पवार, उपआयुक्त, महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन,