पुणे, ता. १७ : कृषी विभागाच्या नव्या आकृतिबंधात तांत्रिक संवर्गातील पदांची संख्या मोठी असली, तरी प्रत्यक्ष क्षेत्रीय काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या गरजा आणि शेतकरी केंद्रित रचनेकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कृषी अधिकारी संघटनेने केला आहे. नव्या आकृतिबंधाची अंमलबजावणी करण्यापूर्वी त्याचा फेरअभ्यास करून सुधारित आकृतिबंध जाहीर करावा, अशी मागणी राज्य कृषी अधिकारी संघटनेने केली आहे.
कृषी विभागाच्या नव्या आकृतिबंधात एकूण २३ हजार ४७६ पदांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी १९ हजार ७२४ पदे (८४ टक्के) तांत्रिक, तर तीन हजार ७५२ पदे (१६ टक्के) अतांत्रिक संवर्गातील आहेत. मात्र, आकृतिबंध तयार करताना तांत्रिक संवर्गातील अडचणी आणि क्षेत्रीय कामकाजाचा पुरेसा विचार झालेला नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष हितेंद्र पगार म्हणाले, ‘‘कृषी विभाग हा प्रामुख्याने तांत्रिक मनुष्यबळावर आधारित विभाग आहे. प्रगतिशील शेतकरी, तज्ज्ञ, कृषी अधिकारी संघटना आणि सेवानिवृत्त कृषी संचालक यांच्याशी चर्चा करून आकृतिबंध तयार होणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही.’’
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील उपकृषी अधिकाऱ्यांची संख्या पूर्वी दोन ते तीन असताना, नव्या आकृतिबंधात ती मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. त्यामुळे क्षेत्रीय स्तरावर शेतकऱ्यांशी थेट संपर्क ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. आकृतिबंधाच्या फेरअभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यासगट नेमावा. त्याच्या अहवालानंतर क्षेत्रीय गरजा आणि शेतकरी केंद्रित कामकाजाचा विचार करून सुधारित आकृतिबंध जाहीर करावा, अशी मागणी संघटनेने कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.