पुणे, ता. १९ : दहावी-बारावीच्या परीक्षांमधील गोपनीयता राखण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ प्रयत्नशील आहे. जून-जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेत प्रायोगिक तत्त्वावर एका विषयाची प्रश्नपत्रिका डिजिटल पद्धतीने थेट परीक्षा केंद्रावर पाठवणे आणि परीक्षेनंतर उत्तरपत्रिकांचे ऑनस्क्रीन मूल्यांकन करण्याचा विचार राज्य मंडळामार्फत होत आहे.
राज्य मंडळातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. दहावी-बारावी परीक्षांच्या प्रश्नपत्रिका वितरण आणि उत्तरपत्रिकांची तपासणी राज्य मंडळाच्या प्रचलित पद्धतीने केली जाते. परंतु, राज्य मंडळ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या परीक्षेत बारामतीत डिजिटल ट्रंकेचा वापर करून प्रश्नपत्रिका पाठवल्या होत्या. आता राज्य मंडळ आणखी एक पाऊल पुढे टाकण्याच्या तयारीत आहे. राज्य मंडळाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरवणी परीक्षेत प्रायोगिक तत्त्वावर प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपात थेट केंद्रावर पाठवण्यात येतील. त्याबरोबरच प्रचलित पद्धतीने प्रश्नपत्रिका केंद्रावर पोहोचविण्याची सोय पुरविली जाईल. डिजिटल पद्धतीने प्रश्नपत्रिका पाठवण्याची यंत्रणा राज्य मंडळाकडून विकसित करण्यात येत आहे. परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करून घेतले जाणार आहे. त्यानंतर ऑनस्क्रीन मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) मदत घेण्यात येईल, असेही राज्य मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.