महामार्गाचे काम अपूर्ण
असताना दिला ‘पूर्ण’ दाखला
तांदूळवाडी विहीर दुर्घटना प्रकरणात ‘एमएसआरडीसी’चे अभियंता सहआरोपी
ॲग्रोवन वृत्तसेवा
पंढरपूर : तांदूळवाडी (ता. माळशिरस) येथील भीषण विहीर दुर्घटनेनंतर म्हसवड-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात अत्यंत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. महामार्गाचे काम प्रत्यक्षात अपूर्ण असतानाही, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी २०२३ मध्येच काम पूर्ण झाल्याचा खोटा दाखला दिल्याची बाब पोलीस तपासात उघड झाली आहे. या गंभीर निष्काळजीपणा प्रकरणी पोलिसांनी एमएसआरडीसी, पुणे येथील कार्यकारी अभियंता दीपाली पोतदार यांच्यासह आणखी एका अभियंत्याला सहआरोपी केले आहे.
गत १४ जून रोजी तांदूळवाडी येथे महामार्गालगत असलेल्या विहिरीत टेम्पो कोसळून झालेल्या भीषण अपघातात पंढरपूर येथील बावचे आणि सातोरे कुटुंबातील ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी रस्ते विकास कंपनीकडे काम करणाऱ्या वैभव जरे या स्थानिक कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मात्र या रस्त्याचे काम पूर्ण नसतानाही अधिकाऱ्यांनी दाखला कसा दिला, यावरून आता प्रशासकीय यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दीपाली पोतदार व इतर एका अभियंत्याला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. दुसरीकडे, या संपूर्ण दुर्घटनेला आणि निकृष्ट कामाला कारणीभूत असलेला मुख्य आरोपी नवज्योत गडोख (मु.पो. पुणे) हा मात्र गुन्हा दाखल होऊन १० दिवस उलटले तरी अद्याप फरार आहे. पोलिसांनी गडोख याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, इतके दिवस होऊनही त्याची साधी चौकशीही करण्यात आलेली नाही. केवळ स्थानिक छोट्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून मुख्य आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.