मलकापुरात शाळकरी मुलीवर
भटक्या श्वानाकडून हल्ला
नागरिकांच्या सतर्कतेमुळे मुलगी बचावली
मलकापूर, ता. १९ : भटक्या श्वानांच्या टोळक्याने शाळकरी मुलीवर हल्ला केला. यावेळी नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे संबंधित मुलगी बचावली. मात्र, या घटनेने शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येथील शास्त्रीनगरमधील रानडे हॉस्पिटल परिसरात आज सकाळी ही घटना घडली. या प्रकारामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
याबाबत माहिती अशी; सध्या येथे भटक्या श्वानांचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढला आहे. अनेकदा भटके श्वान लहान मुले, वृद्धांवर हल्ला करत आहेत. या श्वानांचा रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांनाही त्रास होत आहे. याबाबत अनेकदा तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे.
आज सकाळी शास्त्रीनगरमधील रानडे हॉस्पिटल परिसरात शाळकरी मुलगी रस्त्याने जात असताना सहा ते सात भटक्या श्वानांनी तिच्या दिशेने धाव घेत तिच्यावर हल्ला केला. श्वानांचा हल्ला होत असल्याचे लक्षात येताच मुलीने आरडाओरडा करून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. तिच्या ओरडण्याने परिसरातील नागरिकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सतर्कता दाखवून भटक्या श्वानांना तेथून हुसकावून लावले. त्यामुळे संबंधित मुलीचा जीव बचावला. या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत भटक्या श्वानांचा पालिकेने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.
...........
कोट
...........
शास्त्रीनगर परिसरासह शहरात भटक्या श्वानांचा वावर वाढला आहे. भटके श्वान अचानक मुलांवर हल्ले करत आहेत. नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून भटक्या श्वानांचा त्वरित बंदोबस्त करावा.
- नितीन काशीद-पाटील,
नगरसेवक, मलकापूर
......