गड-किल्ल्यांच्या संवर्धनाला
गती द्या : आशिष शेलार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : राज्यातील गड-किल्ले, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला गती देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून उपलब्ध होणाऱ्या तीन टक्के निधीच्या तरतुदीला २०२६-२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या निधीतून तसेच विभागीय निधीतून सुरू असलेल्या संवर्धनाच्या कामांना गती द्यावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.
ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदोस गढी, भगवंतगड आणि सिद्धगड यांच्या संवर्धनाबाबत निर्णय घेण्यात आले. नांदोस गढी येथे पुरातत्त्व स्थळ संग्रहालय उभारण्यात येणार असून, त्याचे व्यवस्थापन स्थानिक ग्रामपंचायतीकडे सोपविण्यात येणार आहे. भगवंतगडाचा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ‘डिजिटल सर्व्हे’ करून सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात येणार असल्याचे शेलार यांनी सांगितले. सिद्धगडाला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
----
स्मारकांच्या संवर्धनासाठी ४४१ कोटी
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या जिल्हा वार्षिक योजनेतून राज्यातील १८४ स्मारकांच्या संवर्धनासाठी ४४१.१४ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी १६१ कामांना ३७२.३४ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. १०५.६१ कोटी रुपयांची ५२ कामे पूर्ण झाली असून, १८४.६८ कोटी रुपयांची १०८ कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. विभागीय निधीतूनही १०८ कामांना ६२७.६२ कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी १६ कामे पूर्ण झाली असून, ८६ कामे सुरू आहेत.