पुणे

पिंपरी : अनैतिक संबंध उठताहेत जिवावर 

मंगेश पांडे

पिंपरी-चिंचवड : पतीचे अथवा पत्नीचे विवाहबाह्य अनैतिक संबंध एकमेकांच्या जिवावर उठत आहेत. प्रियकराच्या अथवा प्रेयसीच्या मदतीने जीवन संपविण्याच्या घटना वाढल्या असून पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत 10 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या महिनाभरात तीन जणांचा बळी गेला आहे. 

प्रेमात अडथळा ठरणाऱ्या संजय पांडुरंग भोसले या लष्करी जवानाचा पत्नीने त्याच्या प्रियकराच्या मदतीने खून केल्याची घटना रहाटणी येथे 14 नोव्हेंबरला उघडकीस आली. उच्चशिक्षित पत्नीने प्रियकराच्या मदतीने संजय यांना पाण्यातून सोडिअम सायनाइडची गोळी देऊन संपविले.

तसेच, पत्नीशी असलेल्या प्रेमप्रकरणातून पतीने मित्राच्या मदतीने तरुणाचा खून केल्याची घटना 4 डिसेंबरला सूस गाव येथे उघडकीस आली. तर पतीला कुष्ठरोग असून, स्वत:सह मुलांनाही कुष्ठरोग होईल तसेच प्रेमात अडथळा ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला. मागील आठवड्यात गहुंजे येथे 9 डिसेंबरला उघडकीस आली. दामोदर तुकाराम फाळके (वय 47) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनांमुळे पती-पत्नीच्या अनैतिक संबंधांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. 

ही आहेत कारणे 

  • -सोशल मीडिया 

सध्या सोशल मीडियामुळे सातासमुद्रापार असलेली व्यक्तीही जवळ येत आहे. लग्नानंतर सासरी नांदत असताना काही महिला प्रियकराला भेटतात. यातून त्यांच्यात पुन्हा सूत जुळते. मात्र, ही बाब पतीला समजल्यानंतर अघटित घडत जाते. 

  • वैयक्तिक 

शारीरिक, मानसिक आजार, व्यसनाधीनता, सततचे वाद, प्रेमप्रकरण यामुळे पतीचे अथवा पत्नीचे अनैतिक संबंध प्रस्थापित होत असतात. 

  • सामाजिक 

जोडीदाराकडून अपेक्षापूर्ती, हौस- मौज न होणे, इच्छेविरुद्ध लग्न, आवडीचा जोडीदार न मिळणे, सततचे वादविवाद, एकटेपणा जाणवणे, पैशाचा मोह, उच्च लाइफस्टाइल, सिनेमांचा प्रभाव, कौतुक न होणे, इतरांशी तुलना होणे, काल्पनिक सुखाची लालसा, कुटुंबीयांकडून अति मोकळीक मिळणे, जवळच्या व्यक्तींचा अतिविश्‍वास, योग्य वेळी समज न देणे. 

काय होतात परिणाम? 
गुन्हेगारी वृत्ती बळावू शकते, नात्यात कटुता येते, मुलांच्या मनावर वाईट संस्कार, समाजाकडून अवहेलना, राग बळावणे, एक चूक झाकण्यासाठी अनेक चुका होतात. 

  • उपाय 

सुसंवाद गरजेचा, एकमेकांना वेळ देणे, आई-वडील, सासू-सासरे यांचा आदर करणे, नैतिकता, छंद जोपासणे, दुष्परिणामांबाबत जनजागृती करणे, स्वावलंबी होणे, समाज, कुटुंब यांच्यात राहून स्वत:चे अस्तित्व निर्माण करणे, विधुर, विधवा यांची मते जाणून घेऊन कुटुंबीयांनी योग्य मार्गदर्शन देऊन त्यांचा पुनर्विवाहाचा विचार करावा. 

...यांची पुन्हा जुळली मने 

1) पिंपरीतील मासुळकर कॉलनी येथील एका तरुणाचे शेजारील मुलीशी प्रेमप्रकरण होते. ही बाब त्याने कुटुंबीयांपासून दडवून ठेवत दुसऱ्या मुलीशी लग्न केले. लग्नानंतर काही दिवसांनी पुन्हा पूर्वीच्या प्रेयसीला भेटणे-बोलणे सुरू झाले. पाच ते सहा महिन्यांनी ही बाब पत्नीच्या लक्षात आल्यानंतर वडिलांना सांगून पोलिसांकडे तक्रार अर्ज केला. दोघांनाही महिला सहाय्यता कक्षात बोलावून घेण्यात आले. पतीचे समुपदेशन केल्यानंतर तो या गोष्टीपासून परावृत्त झाला. प्रेयसीला भेटणे, बोलणे सोडून दिले. आता या दांपत्याचा सुखाचा संसार सुरू असून त्यांना गोंडस मुलगी आहे. 

2) दिघी येथील एका 42 वर्षीय शिक्षकाचे शेजारीच राहणाऱ्या महिलेशी प्रेमप्रकरण जडले. अनेक दिवसांपासून एकमेकांना भेटणे-बोलणे सुरू होते. ही बाब पत्नीच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्यात सतत वाद होत असत. दरम्यान, न्याय मागण्यासाठी पत्नीने पोलिसांकडे धाव घेतली. याबाबतचा अर्ज महिला सहाय्यता कक्षाकडे आल्यानंतर पतीला बोलावून घेत त्याचे व्यवस्थित समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर शिक्षक पतीने या सर्व गोष्टी सोडून दिल्या. 

परिणामांची जाणीव 

याबाबत अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे म्हणाले, "अनैतिक संबंधामुळे पतीपत्नींमधील वादाबाबत आयुक्तालयाकडे तक्रार अर्ज आल्यास तो महिला साह्य कक्षाकडे पाठविला जातो. त्या ठिकाणी दोघांचेही समुपदेशन केले जाते. होणाऱ्या परिणामांची जाणीव करून दिली जाते. यामुळे अनेक जण अनैतिक संबंधांपासून परावृत्तही झालेले आहेत." 


काही कालावधीनंतर प्रेयसी, प्रियकर एकमेकांमध्ये गुंतले गेल्यानंतर त्यांच्यात इतरांचा अडसर नको असतो. तसेच या संबंधाबाबत पतीला अथवा पत्नीला माहिती झाल्यानंतर राग अनावर न झाल्याने थेट एखाद्याचे जीवन संपविण्याचीही मानसिकता तयार होत असते. अशा घटना रोखण्यासाठी रागावर नियंत्रण ठेवण्यासह एकत्रित कुटुंबपद्धतीही महत्त्वाची आहे. 
- मनजित संत्रे, मानसोपचारतज्ज्ञ  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT