राष्ट्रीय लोकन्यायालयाचे
शनिवारी आयोजन
अहिल्यानगर, ता. १० ः राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशाप्रमाणे आपापसातील वाद समझोत्याने मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन शनिवार (ता.१२ सप्टेंबर) आयोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव योगेश पैठणकर यांनी दिली.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष शिवाजी कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन केले आहे. यामध्ये मोटार वाहन अपघात प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, वीज वितरण कंपनीचे प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, तसेच बँक व वीज वितरण कंपनीचे दाखल पूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय व ग्राहक तक्रार निवारण मंचाची प्रकरणे लोक तडजोडीसाठी ठेवण्यात आलेले आहेत.
प्रकरण मिटवल्यास कोर्ट फी परत मिळते. ज्या नागरिकांना आपली प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायची असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा अहिल्यानगर न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तसेच तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.