निसर्ग मंडळांद्वारे विद्यार्थी जोडणार निसर्गाशी
जिल्ह्यातील शाळांत उपक्रम; कऱ्हाड, फलटण, पाटण, महाबळेश्वर तालुक्यांचा समावेश
कऱ्हाड, ता. १६ ः सह्याद्रीच्या डोंगररांगांत समृद्ध झालेला जैवविविधतेचा वारसा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी निसर्गाच्या अधिक जवळ नेण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कऱ्हाडसह फलटण, पाटण आणि महाबळेश्वर तालुक्यांतील विविध शाळांत निसर्ग मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वन्यजीव, जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनाचे धडे प्रत्यक्ष कृतीतून दिले जाणार आहेत.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व सहकारी संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात विद्यार्थ्यांसाठी निसर्ग व वन्यजीवांशी संबंधित विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. स्थानिक नैसर्गिक अधिवास समजून घेण्यासाठी क्षेत्रभेटी, पर्यावरणीय समस्या व प्रदूषणाबाबत जनजागृती तसेच वन्यजीवांविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातील. जिल्ह्यातील जैवविविधतेचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा, हा या उपक्रमाचा भाग आहे. केवळ पुस्तकातील पर्यावरण शिक्षणावर भर न देता विद्यार्थ्यांनी परिसरातील निसर्ग समजून घ्यावा, त्यातील बदल टिपावेत आणि संवर्धनासाठी कृती करावी, यासाठी प्रयत्न केला जाईल. निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दलची जाणीव आणि जबाबदारी निर्माण करण्यास उपयुक्त ठरतो, असे पर्यावरण शिक्षणाच्या क्षेत्रातील अनुभवातूनही स्पष्ट झाले आहे. तालुकानिहाय उत्कृष्ट शाळेची निवड केली जाईल. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक तालुक्यातून एका उत्कृष्ट शाळेची निवड करण्यात येईल. त्या शाळेला १० हजारांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. सहभागी प्रत्येक शाळेला ‘निसर्ग संच’ देण्यात येईल. त्यामाध्यमातून विद्यार्थ्यांना निसर्ग आणि पर्यावरणाचे शिक्षण देण्यास मदत होणार आहे. स्वच्छ पर्यावरण, जैवविविधता संवर्धन, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर या उपक्रमात भर आहे. कास, सह्याद्री आणि वनसंपदेचा वारसा असलेल्या जिल्ह्यातील नव्या पिढीला हा वारसा समजून घेऊन जपण्याची शिकवण देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.