नवजात बालकाची जिल्हाभर फरफट
उपचाराअभावी पालकांची धावपळ : शासकीय आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणावर संताप
सनी सोनावळे ः सकाळ वृत्तसेवा
टाकळी ढोकेश्वर, ता. १८ ः नवजात बालकाच्या उपचारासाठी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात फिरवून पालकांची फरफट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. शासकीय आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. याप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
राळेगण थेरपाळ (ता. पारनेर) येथील अस्मिता योगेश सरोदे यांना प्रसूती करता निघोज ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र सरोदे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्रसूती झाल्यानंतर नवजात बालकाची प्रकृती गंभीर झाली. तेथे तीन दिवसाच्या उपचारानंतर बालरुग्णाला डाॅ. गायकवाड यांनी छत्रपती संभाजीनगर येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यास सांगितले. पालकांनी अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत बालकाला तेथे दाखल केले. परंतु, संबंधित रुग्णालयाने उपचार शक्य नसल्याचे सांगत याबाबत आधीच आम्ही अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयास कळविल्याचे सांगितले. यानंतर छत्रपती संभाजीनगर सरकारी रुग्णालयाने मुंबई येथील सरकारी के. एम. रुग्णालयात बालरुग्णास हलविण्यास सांगितले.
या ठिकाणीही उपचार होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अखेरीस पालकांना खासगी रुग्णवाहिकेद्वारे पुण्यातील वाडिया रुग्णालयात बालकाला दाखल करावे लागले. तेथे उपचार केल्यानंतर बालकाची प्रकृती स्थिर आहे.
या संपूर्ण प्रकारात पालकांची मानसिक, आर्थिक आणि शारीरिक हेळसांड झाली. सुरवातीला सक्षम रुग्णालयात रेफर केले असते, तर एवढी धावपळ टळली असती, अशी संतप्त प्रतिक्रिया नातेवाईकांनी व्यक्त केली. या गंभीर प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे सरपंच हनुमंत भोसले यांनी केली आहे.
------------
एका नवजात बालकाला जिल्हाभर फिरवून पालकांची अमानुष हेळसांड करण्यात आली. शासकीय आरोग्य यंत्रणेतील निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला. दोषींवर तत्काळ कारवाई झाली नाही, तर नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडू.
-हनुमंत भोसले,सरपंच.