पुणे - नेमबाजी हा श्वासावर नियंत्रण ठेवणारा उत्तम योगाचा प्रकार आहे. पोलिसांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी सरकार कटिबद्ध असून, राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पोलिसांसाठी नेमबाजी प्रशिक्षण केंद्र उभारणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. पोलिस विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करावेत, अशी सूचनाही केली.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात १३ व्या अखिल भारतीय पोलिस नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेचा समारोप ठाकरे यांच्या हस्ते झाला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, ज्येष्ठ महिला नेमबाज चंद्रो तोमर, श्रीमती प्रकाशी तोमर (शूटर दादी), पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई, निवृत्त पोलिस अधिकारी टी. एस. धिल्लन, रितू छाब्रिया उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, स्पर्धेमध्ये जय-पराजय होतच असतात. मात्र, स्पर्धेच्या निमित्ताने पोलिस दलाच्या नेमबाजीतील गुण तक्त्यामुळे समाजातील अपप्रवृत्तीवर दहशत बसेल. हा खेळ श्वासावर नियंत्रण राखणारा मेंदूच्या योगाचा आणि मन:शांतीचा उत्तम पर्याय आहे. याचसाठी मला नेमबाजीचा छंद आहे.
जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, तोमर दादी देशाच्या प्रेरणा आहेत. प्रत्येक पोलिसाचा नेम अचूक असणे आवश्यक आहे. पोलिसांच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट आम्ही करणार आहोत. पोलिस व संरक्षण दलामुळेच सर्वसामान्य लोक निश्चिंत असतात. अचूकता, शिस्त हे पोलिस दलाचे वैशिष्ट्य आहे. विजेत्यांचे अभिनंदन; मात्र पुढच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने विजेतेपद मिळवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सुबोधकुमार जयस्वाल यांनी प्रास्ताविक केले. संदीप बिष्णोई यांनी आभार मानले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.