पुणे, ता. १८ : उत्पादनक्षमता सहापट वाढवत शेतकरी भागीदारी, रोजगारनिर्मिती आणि शाश्वत उत्पादन प्रक्रियेला चालना देणाऱ्या पेप्सिको इंडियाच्या पुणे येथील उत्पादन प्रकल्पाने २५ वर्षांचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला. २००१ मध्ये सुरू झालेल्या प्रकल्पात आतापर्यंत ६०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली असून, हा प्रकल्प देशातील कंपनीच्या वाढीचा मुख्य आधारस्तंभ ठरला आहे.
१५ एकर क्षेत्रात उभारलेल्या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता सध्या ६२ हजार १०० टनांपर्यंत पोहोचली आहे. लेज, कुरकुरे, चीटोज, सॉलिड मस्ती आणि अंकल चिप्स या लोकप्रिय ब्रँडचे उत्पादन येथे केले जाते. पश्चिम आणि दक्षिण भारतातील बाजारपेठांना या प्रकल्पातून पुरवठा केला जातो. गेल्या २५ वर्षांत प्रकल्पाने उत्पादन क्षमता सहापट वाढवली असून, सुमारे एक हजार ४०० जणांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
याबाबत पेप्सिको इंडिया व दक्षिण आशिया पुरवठा साखळी संचालनाचे उपाध्यक्ष रिंकेश सतीजा म्हणाले, ‘‘पर्यावरणपूरक वाहतूक, पाणी बचत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत शेतीला चालना देण्यावर पेप्सिकोने भर दिला आहे. उत्तर प्रदेश-हरियानादरम्यानच्या ‘ईव्ही ग्रीन लेन’मध्ये १३ इलेक्ट्रिक कंटेनर ट्रक कार्यरत असून, या माध्यमातून वर्षाला सुमारे सहा लाख इलेक्ट्रिक किलोमीटरचा प्रवास केला जात आहे. याशिवाय, विविध बाजारपेठांमध्ये वितरकांशी संबंधित ८६० हून अधिक वाहनांचे इलेक्ट्रिक तीन व चारचाकी वाहनांमध्ये रूपांतर केले आहे. त्यामुळे वितरणाच्या शेवटच्या टप्प्यातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होत आहे. पेप्सिकोने राज्यातील शेकडो शेतकऱ्यांबरोबर भागीदारी करत बटाटा उत्पादनासाठी मजबूत कृषी साखळी उभी केली आहे. सूक्ष्म सिंचनाचा शंभर टक्के अवलंब, उत्पादनक्षमता वाढ आणि पुनरुत्पादक शेती पद्धतींचा प्रसार यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि शेतीची गुणवत्ता सुधारण्यास मदत झाली आहे. शाश्वत उत्पादनाच्या दिशेनेही पुणे प्रकल्पाने उल्लेखनीय प्रगती केली आहे.’’
२५५ दशलक्ष लिटर पाण्याची बचत :
प्रकल्पाच्या ९८.६ टक्के ऊर्जेची गरज नवीकरणीय स्रोतांमधून भागवली जाते. २०२२ पासून हा प्रकल्प ‘झिरो लिक्विड डिस्चार्ज’ तत्त्वावर कार्यरत असून, अत्याधुनिक जलसंधारण तंत्रज्ञानामुळे एका वर्षात २५५ दशलक्ष लिटर पाण्याची बचत करण्यात यश आले आहे. त्यामुळे उद्योगवाढीबरोबर पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण विकासाचा समतोल साधणारा आदर्श म्हणून पुणे प्रकल्पाकडे पाहिले जात आहे, असे सतीजा यांनी सांगितले.