वारजे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते वारजे उड्डाण पूल दरम्यान सांडपाणी आणि पावसाळी वाहिनीचे काम रडतखडत सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रकार वाढले असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. दुकानांसमोरच खोदकाम केल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून, व्यवसाय कसा करायचा? असा प्रश्न उपस्थित करत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या पुढील भागात व परिसरातील अनेक सोसायट्यांतून येणारे पावसाळी पाणी गेली अनेक वर्षे रस्त्यावर येत होते. त्यामुळे पावसाळ्यात हा मुख्य रस्ता बंद होत होता. त्याचा फटका वाहतुकीला बसत होता. त्यामुळे येथे सांडपाणी आणि पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र हे काम अगदीच संथ गतीने सुरू आहे.
गेली अडीच महिन्यांपासून हे काम केले जात आहे. एका दिवसात फक्त एकच पाईप टाकला जात आहे. हे काम करताना वाहतुकीचे कोणतेही नियोजन केलेले दिसत नाही. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ताच राहत नसल्याने सकाळी आणि सायंकाळी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच काम सुरू असताना पर्यायी रस्तेही बंद केल्याने एकाच रस्त्यावर वाहतुकीचा ताण येत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडते. यासंदर्भात वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधला असता हे मुख्य खात्याचे काम आहे, असे सांगण्यात आले.
"हे काम अतिशय संथ गतीने चाललेले आहे. काम जलद गतीने करावे. या कामामुळे अर्धा रस्ता अडविला जात असल्याने नागरिकांनी आपली वाहने कशी चालवावीत, असा प्रश्न पडतो."
- चंद्रकांत केंगार, नागरिक
"एवढ्या सावकाश काम होत असेल तर काम पूर्ण कधी होणार? तोपर्यंत नागरिकांनी वाहतूक कोंडीचा सामना करायचा का? त्यामुळे महापालिकेने कामाचा वेग वाढवावा."
- गणेश पवार, नागरिक
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.