पुणे : वैकुंठ स्मशानभूमीतील धुरामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास होत असल्याने नागरिकांनी तक्रारी केल्याने आता शहरातील महत्त्वाच्या स्मशानभूमीत सुधारणा करण्यासाठी विद्युत विभागाने पाऊल उचलले आहे. स्मशानभूमींमधून धूर कमी करून प्रदूषण रोखण्यासाठी १३ स्मशानभूमीत प्रदूषण नियंत्रण यंत्रणा (एसपीसी) बसविण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे ८ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.
केंद्र शासनाकडून पुणे महापालिकेला १५व्या वित्त आयोगांतर्गत २१७ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामध्ये शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी व हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी १३४ कोटी रुपये मिळाले आहेत. तर घनकचरा व्यवस्थापन, मैलापाणी वहन व्यवस्था सुधारणा आणि पाणीपुरवठ्याचे काम करण्यासाठी ८३ कोटीचा निधी आहे.
शहराचा विस्तार होत असताना स्मशानभूमीच्या परिसरात वस्ती वाढत आहे. स्मशानभूमीत शव दहन करण्यासाठी दिवसातील काही तास गॅस दाहिनी, विद्युत दाहिनी तसेच लाकडाचा वापर केला जातो. यातून बाहेर पडणारा धूर आणि राखेमुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. महापालिकेने धूरासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या नियमानुसार चिमण्या उभारल्या असल्या तरी नागरिकांना त्रास होत आहे, त्यामुळे आता यात सुधारणा केली जाणार आहे.
शहरातील १३ स्मशाभूमींमध्ये हायब्रीड दाहिन्या बसविण्यात येणार आहेत, त्यातून यंत्रणेत मोठे बदल केले जात आहेत. या यंत्रणेद्वारे धुरातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी केले जाते. तर १३ ठिकाणी हायब्रीड म्हणजे विद्युत आणि गॅस दाहिन्यादेखील बसविल्या जाणार आहेत. यासाठी प्रत्येकी सुमारे ६० लाख रुपयांचा खर्च येईल. यासाठीची ही प्रक्रिया सुरु केली जाणार असल्याचे विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.